दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय आज आपचे आणखी सहाजण शपथ घेणारेत. मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम हे केजरीवाल सरकारमधील महत्वाचे शिलेदारही आज शपथ घेतील. मात्र अशा या ऐतिहासिक सोहळ्यासाठी इतर राज्यातल्या एकाही मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केजरीवालांनी निमंत्रण दिलंय. मात्र पंतप्रधान वाराणसी दौऱ्यावर असल्याने तेही या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकणार नसल्याचं सांगण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकुणच केजरीवाल यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने हा सोहळा फक्त आणि फक्त आपचे नेते, कार्यकर्त्यांसोबतच साजरा करण्याचं ठरवलेलं दिसतंय. यात अर्थातच त्यांना भरभरून मतांची झोळी दिलेल्या दिल्लीकरांना मात्र आवर्जून बोलावण्यात आलंय. तसंच दिल्लीतल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही खास निमंत्रण आहे.


आपची हीच अपेक्षा आहे की रामलीला मैदान दिल्लीकरांनी खचाखच भरून जाईल. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मैदानाच्या बाहेरही एलईडी स्क्रीन लावण्यात आलेत. मुख्य व्यासपीठाबरोबरच आणखी दोन मंच तयार करण्यात आलेत. इथे व्हीव्हीआयपींना बसण्याची खास व्यवस्था करण्यात आलीये. 


मात्र हे व्हीव्हीआयपी कोणी बडे नेता नव्हे तर दिल्लीतल्याच ५० खास व्यक्ती आहेत, ज्यांना दिल्लीचे निर्माता म्हणून संबोधित करण्यात आलंय. यामध्ये शिक्षक, शाळेतले शिपाई, मुख्याध्यापक, मोहल्ला क्लिनिकचे डॉक्टर्स, बाईक अॅब्युलन्सचे रायडर, सफाई कर्मचारी, अंगणवाडीतील महिला कर्मचारी यांचा समावेश असणारे. व्हिव्हीआयपी मंचावर खास पाहुणे म्हणून ही मंडळी असतील.


दिल्लीकरांनी तर केजरीवाल सरकारला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय. आता केजरीवाल सरकारची जबाबदारी आणखी वाढलीये. दिल्लीकरांच्याही अपेक्षा खूप वाढल्यात आणि हेच केजरीवाल सरकारपुढचं खरं नवं आव्हान असेल. आता दिल्लीकर रविवारची सुटी घरी बसून साजरी करतात की ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रामलीला मैदानात गर्दी करतात हे पाहणंही उत्सुकतेचं असणारे.