Pawar Agreed To Form Government Then Backed Off: महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतरच्या अभुतपूर्व सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक पहाटेच्या वेळी राजभवनात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. याच पहाटेच्या शपथविधीसंदर्भात आता विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नवीन खुलासा केला आहे. हा शपथविधी कधी झाला? शपथविधीच्या आधीच्या दिवसांमध्ये काय घडलं याबद्दलची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 


...तेव्हा राष्ट्रवादी भाजपाबरोबर जाऊ शकते असं समजलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. "शरद पवारांचं गुपीत समजून घ्यायचं असेल तर त्यांचा इतिहास समजून घ्यायला हवा. हा इतिहास समजला तरच गुपीत उघड करता येईल. उद्धव ठाकरेंनी युती तोडून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरु केली. त्यानंतर त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) आमचा फोनही घेणं बंद केलं. त्यावरुनच ते आमच्याबरोबर येणार नाहीत हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्हीही पर्याय शोधण्यास सुरुवात केली. आमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा आम्ही विचार करत असताना राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपाबरोबर येऊ शकते आणि राज्यात स्थिर सरकार देऊ शकते," असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 


राष्ट्रवादी आणि भाजपाच्या बैठकीत ठरला फॉर्म्युला


राष्ट्रवादी सोबत येईल असे संकेत मिळाल्यानंतर भाजपा आणि शरद पवारांची बैठक झाल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. “यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्याचं ठरलं. सरकार कसं असेल, याचा आराखडा एकत्रितपणे तयार करण्यात आला. या सरकारचं नेतृत्व अजित पवार आणि मी दोघं  करणार असंही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला देण्यात आले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारीही केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी यामधून माघार घेतली,” असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.


 


नक्की वाचा >> "...अन् शिंदेंनी चूक मान्य केली"; फडणवीसांचा खुलासा; 'सरकार पडेल असं वाटत असणाऱ्यांना'ही इशारा


 


पवारांना सांगूनच सरकारची स्थापना


“आमचा शपथविधी व्हायच्या 3-4 दिवस आधी शरद पवारांनी यामधून माघार घेतली. आम्ही (अजित पवार आणि मी) पूर्ण तयारी केली होती त्यामुळे अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय इतर पर्याय उरला नाही. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. आपण इतक्या बैठका घेतल्या असल्याने बाकीच्या (राष्ट्रवादीच्या) आमदारांसहीत शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण तसं घडलं नाही आणि शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळेच आमचं सरकार पडलं. मात्र मी हे ठामपणे सांगेन की, त्यावेळी जो सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता त्याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती,” असा दावा फडणवीस यांनी केला आहे.


 


नक्की पाहा >> Photos: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं


 


उद्धव ठाकरेंचा उल्लेख


फडणवीस यांनी हा घटनाक्रम सांगितल्यानंतर मुलाखतीमध्ये त्यांना, शरद पवारांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “उद्धव ठाकरेंनी जे केलं त्याला पाठीत खंजीर खुपसणं म्हणतात कारण शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलं,” असं फडणवीस म्हणाले.