कंगनाच्या फोटोला जोडे मारणाऱ्या शिवसेनेवर अमृता फडणवीस संतापल्या, म्हणाल्या...

शिवसेनेने अत्यंत खालची पातळी गाठली आहे.   

Updated: Sep 4, 2020, 08:45 PM IST
कंगनाच्या फोटोला जोडे मारणाऱ्या शिवसेनेवर अमृता फडणवीस संतापल्या, म्हणाल्या... title=

मुंबई: शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात पेटलेल्या वादात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेने या साऱ्या वादात अत्यंत खालची पातळी गाठल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. कंगना राणौत हिने शुक्रवारी सकाळपासून शिवसेनेविरोधात ट्विट करण्याचा सपाटा लावला आहे. शिवसेनेने मला रोखूनच दाखवावे, असे जाहीर आव्हानही तिने दिले होते. यामुळे संतप्त झालेल्या महिला शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबईत कंगना राणौतच्या फोटोला जोडे मारून तिचा निषेध केला. मात्र, शिवसेनेची ही कृती अत्यंत खालच्या पातळीची असल्याची टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. 

कंगना म्हणजे झाशीची राणी; शिवसेना नेत्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही- राम कदम

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एखाद्याने व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत नसू. मात्र, लोकशाहीत आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य, श्रद्धेचे स्वातंत्र्य, आंदोलनाचे स्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्याची कधीही मुस्कटदाबी होता कामा नये. आपण एखाद्यावर टीका करू शकतो. मात्र, टीकाकाराच्या फोटोला जोडे मारणे, ही अत्यंत खालची पातळी आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. 

झाशीची राणी होण्यासाठी कर्मभूमीवर निष्ठा असावी लागते; भाऊजींनी कंगनाला झापले

कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. येत्या ९ तारखेला कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.