कोरोनाशी लढण्यासाठी मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याची 'थ्री लॉक रणनिती'

देशभरात या रणनितीचं होतंय जोरदार कौतुक 

Updated: May 24, 2020, 01:21 PM IST
कोरोनाशी लढण्यासाठी मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याची  'थ्री लॉक रणनिती'  title=

मुंबई : देशात कोरोनाने सर्वात प्रथम प्रवेश केला तो केरळमध्ये. केरळमध्ये ३० जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. साडे तीन महिन्यात केरळने कोरोनावर चांगलीच मात केली आहे.  केरळमध्ये ७३२ कोरोना रूग्ण आढळले असून ५१२ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये २२० रूग्णांवर उपचार सुरू, रिकव्हरी रेट ६९.९४ टक्के इतका आहे. केरळमधल्या थ्री लॉक रणनितीचं देशभरात कौतुक होत आहे.

केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा यांच्याबरोबरच कोचीनचे  पोलिस आयुक्त विजय साखरे यांच आणि त्यांची थ्री लॉक रणनितीचं देशभरात कौतुक होतंय. विजय साखरे हे नागपूरचे असून आयपीएस अधिकारी आहेत. साखरे यांच्या थ्री लॉक रणनितीमुळेच केरळने कोरोनावर खूप चांगल्या प्रकारे मात करून रूग्णांच्या आकड्यावर नियंत्रण मिळवलं आहे. देशभरात २४ मार्चला लॉकडाऊन करण्यात आलं पण केरळात तर लॉकडाऊन २० मार्चलाच करण्यात आलं. (केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा ठरल्या 'कोविड-१९ रणरागिणी') 

केरळच्या कासारगोडमध्ये २० मार्चला लॉकडाऊन केलं. मात्र २३ आणि २४ मार्च रोजी कोरोनाबाधित सर्वाधिक रूग्ण कासारगोडमध्ये सापडले. यानंतर केरळ मुख्यमंत्र्यांनी एक स्पेशल पोलीस ऑफिसरला पाठवून कंटन्मेंट करण आवश्यक आहे. त्यावेळी पोलीस अधिकारी विजय सारखे यांची कोविड पोलीस ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. विजय साखरे आणि त्यांच्या सहकर्मचाऱ्यांमध्ये कासारगोड आता कोरोनामुक्त आहे. 

केरळमध्ये राजकीय नेत्यांनी घेतलेला निर्णय हा खूप महत्वाचा होता असं, विजय साखरे सांगतात. कोरोना व्हायरस हा जागतिक महामारी आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याची निवड करण हा खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे जो येथील राजकीय नेत्यांनी घेतला. कोरोनावर अद्याप औषध सापडलेलं नाही. लस संशोधन सुरू आहे. जोपर्यंत कोरोनावर औषध सापडत नाही तोपर्यंत कोरोनाचा प्रसार कसा थांबवता येणार हा खूप मोठा प्रश्न आहे. यावर सध्यातरी नागरिकांची रेलचेल कमी करणं हा एकच उपाय दिसत आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी देणं हा महत्वाचा निर्णय केरळमध्ये राजकीय नेत्यांनी घेतला आणि त्याचा केरळला खूप मोठा फायदा झाल्याचं दिसून येतंय. 

उपचार काहीच नसल्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणं गरजेचं आहे. यावेळी साखरे यांनी कासारगोड येथे सर्वात प्रथम जाऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये नागरिकांची हालचाल थांबवण गरजेचं आहे आणि यासोबत आपली स्वतःची काळजी देखील तितकीच महत्वाची आहे, हे सांगितलं. स्ट्रॅटेजी बनवून २५ मार्चपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. 

काय आहे थ्री कॉल रणनिती? 

लॉक रणनिती ही लोकांच्या हालचालीवर बंधन आणणारी रणनिती आहे. पहिला लॉक म्हणजे संपूर्ण भारतात जी रणनिती आखली आहे. त्याच केरळमध्ये काटेकोरपणे पालन केलं. 

दुसरा लॉक म्हणजे कोरोनाबाधित रूग्णांची माहिती मिळाल्यावर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या आणि त्या दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा आढावा घेतला. म्हणजे कोरोनाबाधित रूग्णाशी भेटलेल्या व्यक्तींची चैन ओळखली. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे कोरोनाबाधितांची घर शोधून काढली. घर मार्क केल्यानंतर लक्षात आलं की कोरोनाबाधितांची घर अशी पसरलेली नाही. काही प्रमाणात आहेत. त्या घरांना आयसोलेशन करण्याचा निर्णय साखरे यांनी घेतला. जेणे करून इन्फेक्शन बाहेर जाणार नाही. त्यानंतर २८ मार्चला ११ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. यामध्ये कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना बाहेर जाण्यास परवानगी नाही तसेच बाहेरच्या व्यक्तीस आत येण्यास परवानगी नाही. पण येथील नागरिकांना आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी पुरवल्या. 

तिसरा लॉक - लॉक थ्री ही खूप खास रणनिती आहे. कासारगोड जिल्ह्याची लोकसंख्या ही १५ लाख आहेत. ही १५ लाख नागरिक हे रूग्ण नाहीत तसेच ते इन्फेक्टेड देखील नाहीत. कोरोना व्हायरस हा बाहेरून आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लॉकमध्ये सर्वात प्रथम परदेश दौरा करून आलेल्या व्यक्तीची माहिती मिळवली. त्या व्यक्तीच्या पहिल्या आणि दुसऱ्या साखळीत भेटलेल्यांची यादी तयार केली. तसेच कोरोनाबाधितांची यादी तयार केली. कोरोना पसरवण्याची त्यांची क्षमता किती आहे याची माहिती मिळवली. हा आकडा २५ हजार इतका होता. आता साखरे यांच्यासमोर आव्हान असं होतं की, या २५ हजार लोकांना घरी बसवून ठेवणं आवश्यक होतं. 

या २५ हजार रूग्णांपैकी कोणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे हे शोधून काढलं. त्या रूग्णांच्या घराबाहेर पोलीस ठेवण्यात आले. त्यामुळे या लोकांना घराबाहेर पडणं शक्यच झालं नाही. ते रूग्ण घरी असल्यामुळे कोरोनाचा प्रसार बाहेर झाला नाही. त्यानंतर १५ ते २० घरांना जोडून एक मोटर सायकल पेट्रोल तयार करण्यात आली. यामध्ये पोलिसांना या लोकांच्या घरात जाऊन नागरिकांची उपस्थिती दररोज तपासायची होती. यामुळे नागरिकांच्या तब्बेतीची माहिती दररोज मिळत होती. ड्रोन बिट सुरू केलं. पोलीस किंवा गार्ड नसेल तर तिथे ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आलं. तिसऱ्या लॉकमध्ये साखरे यांनी चौथ काम असं केलं की, सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले. दररोज फुटेज तपासलं जात असं. 

काय आहे कोविड सेफ्टी ऍप? 

या ऍपमध्ये एसओएस बटण आहे. हे बटण कुणीही दाबलं तर पोलिसांना याची माहिती मिळायची. मग पोलीस त्या रूग्णाकरता तातडीने ऍम्ब्युलन्स अथवा पोलीस व्हॅन पाठवायचे. या ऍपचा दुसरा फायदा असा झाला की, लोकांना क्वारंटाईन ठेवायला खूप मदत झाली. क्वारंटाईन असलेली व्यक्ती ५० मीटरपेक्षा लांब गेली तर त्याची तात्काळ माहिती पोलिसांना मिळायची.