अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 10, 2023, 09:08 AM IST
अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस title=

Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना, केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला कळवले की त्यांनी अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर गुटखा कंपन्यांसाठी केलेल्या जाहिरातींबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने यावर पुढील कारवाईचा तपशील मागवला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मे 2024 रोजी होणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारत सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी न्यायमूर्ती राजेश चौहान यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी युक्तिवाद केला. अक्षय कुमार गुटख्याला प्रोत्साहन देण्यासाठी दोषी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या वतीने शाहरुख खान आणि अजय देवगण यांना ऑक्टोबर महिन्यात नोटीस बजावण्यात आली आहे, असे सरकारने खंडपीठासमोर सांगितले आहे.

अधिवक्ते मोतीलाल यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेत, भारत सरकारच्या पद्म पुरस्काराने सन्मानित कलाकारांकडून गुटख्याची जाहिरात केली जात आहे. गुटख्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांमुळे लोकांचा भ्रमनिरास होत आहे, असे म्हटले होते. ऑगस्ट 2023 रोजी उच्च न्यायालयाने या याचिकेवर नोटीसला उत्तर न दिल्याने कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना अवमान नोटीस बजावली होती. त्यावर आता तिन्ही अभिनेत्यांना नोटीस पाठवल्याची माहिती सरकारने कोर्टात दिली आहे. 

शुक्रवारी डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अमिताभ बच्चन यांनी गुटखा कंपनीशी केलेला करार रद्द करूनही त्याची जाहिरात दाखवणाऱ्या गुटखा कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 2024 मध्ये घेण्याचे ठरवलं आहे.

दरम्यान, टीकेमुळे अक्षयने गेल्या वर्षी विमलचे ब्रँड अॅम्बेसेडर पद सोडले होते. याबाबत अक्षयनेही स्पष्टीकरण दिले होते. त्याने सांगितले की जाहिरात प्रत्यक्षात 2021 मध्ये शूट झाली होती.

अक्षय कुमारने मागितली होती माफी

'मी पूर्ण नम्रतेने माघार घेतो. मी संपूर्ण जाहिरात फी एका चांगल्या कामासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रँड त्याच्या करारानुसार कायदेशीर कालावधीसाठी जाहिरात प्रसारित करू शकतो, परंतु मी भविष्यात पर्याय निवडताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे वचन देतो. त्या बदल्यात मी तुमचे प्रेम मागत राहीन,' असे अक्षय कुमारने म्हटलं होतं.