अनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप

मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  

Updated: May 26, 2020, 02:25 PM IST
अनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप  title=
ANI Photo

मुंबई : मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. देशभरातल्या लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने ठप्प पडलेली देशांतर्गत विमानसेवा काल सुरु झाली खरी. मात्र अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने, विमान प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. जर ही विमानसेवा रद्द करायची होती तर सुरु का करण्यात आली. लॉकडाऊन आणि कोरोनाच धोका असताना पुन्हा माघारी परतावे लागणार आहेत. त्यामुळे येण्या-जाण्याचा खर्च कोण देणार, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. 

दरम्यान, १ हजार १५० उड्डाणांपैकी दिल्लीतल्या ८२ फेऱ्यांसह देशभरातील एकूण ६३० विमानसेवा रद्द करण्यात आल्या. या विमानसेवेसाठी २२ मेपासूनच बुकिंग सुरु करण्यात आले होते. मात्र कोरोना वाढण्याच्या भीतीने महाराष्ट्रासह, तामिळनाडू आणि इतर काही राज्यांनी विमानसेवेवर मर्यादा घातल्याने, या सेवा रद्द कराव्या लागल्या. 

नव्या सूचनांनुसार विमान झेपावण्याच्या किमान दोन तास आधी प्रवासी विमानतळावर आले. मात्र तिथे पोहोचल्यावर उड्डाण रद्द झाल्याचे कळल्याने या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान दिल्लीहून जास्त करून पूर्व आणि ईशान्य भारताकडची विमानसेवा रद्द केली गेली. अम्फान वादळाने निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे इथली उड्डाणं रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.