राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांचे मोदींकडून अभिनंदन

बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय. भ्रष्टाचार विरोधात उचललेले चांगले पाऊल आहे, असे मोदी यांनी ट्विट केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 26, 2017, 07:37 PM IST
राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांचे मोदींकडून अभिनंदन title=

नवी दिल्ली : बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय. भ्रष्टाचार विरोधात उचललेले चांगले पाऊल आहे, असे मोदी यांनी ट्विट केलेय.

 संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी आज संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नितीश कुमार आज संध्याकाळी राजभवानात जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठा यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला.  

गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता. मात्र, तेजस्वी यादव कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका लालू प्रसाद यादव यांनी घेतली होती. 

लालूप्रसाद यांना भ्रष्टाचार आरोपाच्या स्थिती रक्षण देणे योग्य होणार नाही. मला अशा स्थितीत काम करणे अशक्य होते. त्यामुळे मी माझा राजीनामा दिलाय, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली. मी कोणाचा राजीनामा मागितलेला नव्हता. माझ्यावर खूप आरोप होऊ लागले. त्यामुळ काम करणे शक्य नव्हते, असेही स्पष्टीकर त्यांनी दिले.