पुढील काही तास 'वायू' चक्रीवादळाचा धोका; 'या' भागांमध्ये सतर्कतेचा इशारा

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता 

Updated: Jun 11, 2019, 11:14 AM IST
पुढील काही तास 'वायू' चक्रीवादळाचा धोका; 'या' भागांमध्ये सतर्कतेचा इशारा title=
संग्रहित छायाचित्र

अहमदाबाद : एकिकडे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पावसामध्ये काही अडचणी येणार असल्याचं भाकीत करणाऱ्या आयएमडीकडून भारतीय समुद्रकिनारी भागाच्या काही ठिकाणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार अरबी समुद्रात 'वायू' नामक चक्रीवादळ तयार झालं आहे. जे गुजरातच्या किनारी भागातून पुढे मुंबईच्या दिशेने येणार आहे. 

१२ आणि १३ जून या दोन दिवशी या वादळाचे परिणाम किनारी भागांत असणाऱ्या काही ठिकाणांवर होणार आहेत. ज्यामध्ये ११० किमीपासून ते अगदी १३५ किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुंबईत आज वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरीही, या वादळाचा फटका मात्र मुंबईला बसणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईच्या समुद्र किनारी भागापासून दूर २५०- ३०० किमी अंतरावरुन हे वादळ बुधवारी सकाळच्या सुमारास पुढे सरकण्याची चिन्हं आहेत. 

'वायू' चक्रीवादळाचा एकंदर प्रवास आणि वादळी वाऱ्यांचा वेग पाहता मासेमार आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात राहणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

गुजरातच्या या भागात मुसळधार पावसाची शक्यता

'वायू' चक्रीवादळामुळे सौराष्ट्रपर्यंतच्या किनारी भागात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. वादळामुळे अहमदाबाद, गांधीनगर आणि राजकोटसह अन्य किनारी परिसर म्हणजेच वेरावल, भूज आणि सुरतमध्येही हलक्या पावसाच्या सरींची हजेरी असणार आहे. आयएमडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अरबी समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या भागात ११५ किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहेत.