एक्झिट पोल प्रमाणेच निवडणुकीचा निकाल लागेल, जेटलींचा दावा

 एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.

Updated: May 20, 2019, 07:11 PM IST
एक्झिट पोल प्रमाणेच निवडणुकीचा निकाल लागेल, जेटलींचा दावा  title=

नवी दिल्ली : एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा सरकारच पुन्हा बहुमताने येणार असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

जवळजवळ सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा सरकार 272 चा जादुई आकडा पार करणार आहेत. एक्झिट पोलमध्ये ईव्हीएमचे काही योगदान नसते. निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलप्रमाणेच लागला तर विरोधकांची ईव्हीएमवरील टीका निरर्थक ठरणार असल्याचे जेटली म्हणाले. असे झाले तर मतदार किती परिपक्व आहे हे स्पष्ट होईल. कारण मतदान मत देण्यापूर्वी राष्ट्रीय हिताचा विचार करतात. जेव्हा चांगले विचार करणारे समान विचाराने एकाच दिशेने मतदान करतात तेव्हाच असे होऊ शकते असे जेटली म्हणाले. 

गांधी परिवार हा ग्रॅण्ड ओल्ड पार्टीसाठी ओझ बनला आहे. काँग्रेसमधला मोठा परिवार ही ताकद राहिली नसून ओझ बनल्याची टीका जेटली यांनी केली आहे. मतदान आता विरोधकांवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. जातीवर आधारित आघाड्या मतदारांना मान्य नाहीत. तसेच लोक आता खोट्या मुद्द्यांवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत असेही जेटलींनी स्पष्ट केले.