'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी  आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं. 

कपिल राऊत | Updated: Aug 15, 2023, 07:02 PM IST
'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही title=

CM in Irsalwadi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी  (CM Eknath Shinde) आज इरसालवाडीचा (Irshalwadi) दुसऱ्यांदा दौरा केला. दरडीखाली गाव गेल्यानंतर इथल्या पुनर्वसनाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. इथल्या लोकांना तातडीनं घरं आणि जीवनावश्यक गोष्टी पुरवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. येत्या सहा महिन्यात इर्शालवाडीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे (Rehbilitation) देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. दुर्घटनाग्रस्तांसाठी खालापूर भागातील चौक या ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनीया निवाराकेंद्राची पाहाणी  केली.

इरसालवाडीतल्या 42 कुटुंबियांच्या घराचा प्रश्न तर सोडवणारच, त्याच बरोबर त्यांचा रोजगार ,शिक्षण विधवा महिलांचा आणि 22 अनाथ मुलांचा प्रश्न ही मार्गी लावला असून मी शेवट पर्यंत तुम्हच्या बरोबर आहे. तुम्हला वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शालवाडी च्या लोकांना दिला. तसंच इथल्या मुलांना मुलांना खेळणी ,फळ आणि मिठाईचं वाटपही करण्यात आलं.

तात्पुरत्या निवारा केंद्रात पुर्नवसन
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इर्शाळवाडीतील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी या ग्रामस्थांचे ज्या कंटेंनरमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले होते त्याची देखील त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान एका घरात अभ्यासाला बसलेली एक चिमुरडी त्यांना दिसली. त्यांनी या मुलीच्या बाजूला बसून तिची आस्थेवाईकपणे  चौकशी केली. तसेच तिला  चांगला अभ्यास करायचा  असे बजावत त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिले. इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण 22 लहान मुले अनाथ झाली असून त्यांच्या शिक्षणाची आणि पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनने घेतली असून त्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही खंड पडणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

सरकार आणि मुखयमंत्र्यांच्या पुढाकाराने इथल्या रहिवाशांसाठी खालपुर चौक या भागात एक सुंदर गाव उभारण्यात आलं आहे. या रहिवाशांना अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व गोष्टी देण्यात आल्या आहेत. यात सकाळ,दुपारी आणि संध्याकाळ 200 माणसांचं जेवण त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी नर्सरी, खेळण्यासाठी मैदान, चोवीस तास गरम आणि थंड पाणी, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन,अशा पद्धतीची सुविधा दुर्घटनाग्रस्त नागरिकांना देण्यात आल्या आहेत. 

विरोधकांना उत्तर
आजाराचं कारण देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं जाईल असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. या चर्चांना मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. माजी तब्येत चांगली आहे. मी ईरशाळवाडीला व्हॅनिटी व्हॅन घेवून आलो नव्हतो मी चिखल तुडवत वर गेलो, अनेक लोकांची कामे केलीत आणि त्यांचेच आश्रिवाद माझ्या मागे आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही असं सीएम शिंदे यांनी म्हटलंय. तसंच सरकार स्थापन झाल्या पासून ते पडणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. सध्या अनेक जोतिषी तयार झालेत. पण हे सरकार चांगले आणि महत्वाचे निर्णय घेत आहे  असं प्रत्युत्तर सीएम शिंदे यांनी विरोधकांना दिलं आहे.