जन्मदात्या पित्याने दोन चिमुकल्यांची पेटवून केली हत्या

  हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. माजलगाव तालुक्यातील टालेवाडीत जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोघा मुलांची पेटवून हत्या केली. या क्रुरकर्म्याचे नाव कुंदन वानखेडे आहे. कुंदनचे पत्नीशी गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरु होते. यातून हे कृत्य केले.

Updated: Jun 22, 2017, 06:09 PM IST
 title=

बीड : जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. माजलगाव तालुक्यातील टालेवाडीत जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोघा मुलांची पेटवून हत्या केली. या क्रुरकर्म्याचे नाव कुंदन वानखेडे आहे. कुंदनचे पत्नीशी गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरु होते. यातून हे कृत्य केले.

बायकोच्या वादाचा राग  जन्मदात्या पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांवर काढला. गाढ झोपेत असलेल्या मुलांवर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. त्यानंतर पित्याने घराला कडी लावली अन् पसार झाला. यात दोघांचाही करुण अंत झाला. 

ही घटना माजलगाव तालुक्यातील  टालेवाडी येथे गुरुवारी उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात सन्नाटा पसरलाय. बलभीम कुंदन वानखेडे (२.५ वर्ष) व वैष्णव कुंदन वानखेडे (४.५ वर्ष) अशी त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कुंदन सुधाकर वानखेडे याचा श्रृंगारवाडी येथील नंदा हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना ही दोन मुले होती. 

कुंदन शेती व्यवसाय करतो. गेल्या वर्षभरापासून पती- पत्नीत सतत खटके उडत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यातील वाद टोकाला गेला. त्यानंतर बायको माहेरी श्रृंगारवाडीला निघून गेली. तेव्हापासून ती माहेरीच राहते. तिची दोन्ही मुले कुंदनकडे होती. 

दरम्यान, गुरुवारी पहाटे दोन्ही मुले झोपेत असताना कुंदनने त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटविले. आगीच्या ज्वालांनी मुलांनी आक्रोश केला. मात्र, निर्दयी कुंदने घराला बाहेरुन कडी लावून पळून गेला. आगीत होरपळून दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सकाळी त्याच्या घरातून धूर येत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी कुलूप तोडून आत डोकावून पाहिले तेव्हा दोन्ही मुलांचा अक्षरश: कोळसा झाल्याचे निर्दशनास आले. 

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस परार कुंदन वानखेडेचा शोध घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात येत आहे.