कोल्हापूरकर आणि ७४ टक्के पेक्षा जास्त मतदानाचा चंग

ही प्राथमिक आकडेवारी आहे. यात आणखी वाढ होण्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी

Updated: Oct 22, 2019, 05:06 PM IST
कोल्हापूरकर आणि ७४ टक्के पेक्षा जास्त मतदानाचा चंग title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात चक्क ७४ टक्के मतदान झालं आहे. दर निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीचा उच्चाकं गाठला जातो. तसेच मतदान वाढवण्याचा चंगच कोल्हापूरकरांनी बांधला आहे. त्यात विशेष म्हणजे ही प्राथमिक आकडेवारी आहे. यात आणखी वाढ होण्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातल्या १० पैकी ६ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. तर भाजपा आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ आमदार आहेत. त्यामुळे कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे. आता याची पुनरावृत्ती होईल का? याची उत्सुकता लागून राहिली आहे. कोल्हापूरकरांनी विक्रमी ७४ टक्के मतदान केलंय. त्यामुळे निकालांची उत्सुकता आणखीच ताणली गेलीय. 

कोल्हापुरात सर्वाधिक मतदान होण्याची काही कारणं

मुळातच कोल्हापूरचा मतदार हा जागृत आणि राजकारणात रस असलेला आहे. गटातटाच्या राजकारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघंही इर्शेने मतदानासाठी बाहेर पडले. जिल्ह्यातल्या पूरस्थितीचेही पडसाद या मतदानात दिसून आले.

प्रत्येक निवडणुकीत राजकीय गणितं वेगळी त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढल्याचा अंदाज आहे. कोणावर अन्याय झाला किंवा कोणी फसवलं अशी भावना निर्माण झाल्यास त्याला मतपेटीतून मतदार राजा उत्तर देतो त्यामुळे टक्केवारी वाढल्याचं बोललं जातंय. 

गट तट टोकाची इर्शा हा कोल्हापूरच्या राजकारणाचा गाभा. त्यामुळे अनेक मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्या. काही ठिकाणी तर विद्यमान आमदाराला पाडायचंच असा चंगच बांधून मतदार घराबाहेर पडल्याचं दिसलं. 

मतदानाची टक्केवारी वाढल्यास सत्ताधाऱ्यांना फटका बसल्याचं इतिहास सांगतो. त्यामुळे आता कोल्हापूरचं विक्रमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाच्या अडचणी वाढवणार याची उत्सुकता आहे.