कोकणात अनेक मोठे उद्योग, लघु उद्योजकांसाठी नवी संधी - सुभाष देसाई

आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

Updated: Jul 2, 2020, 07:42 AM IST
कोकणात अनेक मोठे उद्योग, लघु उद्योजकांसाठी नवी संधी - सुभाष देसाई title=
संग्रहित छाया

मुंबई : आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत, याद्वारे कोकणातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी येथे केले. कोकण उद्योग फोरमच्यावतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावरील वेबिनारमध्ये  देसाई बोलत होते. मुंबई आणि परिसरातील सुमारे दोनशे छोटे-मोठे उद्योजक यात सहभागी झाले होते.

२४ हजार कोटींचे सामजंस्य करार

उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून सध्या ७० हजार उद्योग झाले आहेत. त्याद्वारे सुमारे १६  लाख कामगार रुजू झाले आहेत. अलीकडेच राज्य शासनाने काही परदेशी कंपन्यांसोबत  २४ हजार कोटींचे सामजंस्य करार केले आहेत. यातील बरेच उद्योग हे कोकणात सुरु होणार आहेत. याद्वारे कोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत. त्याचा कोकणातील उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे  देसाई म्हणाले.

 ५०० कोटी रुपयांची तरदूत 

राज्यशासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी ५०० कोटी रुपयांची तरदूत केलेली आहे. त्यातील बहुतांश हिस्सा कोकणासाठी राखीव ठेवला आहे. सेवा उद्योगासाठी दहा लाख तर मोठ्या भांडवलासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज काढता येईल. या दोन्ही योजनांमध्ये उद्योजकांचा हिस्सा केवळ १० टक्के असेल. बाकीचे सर्व पैसे राज्य सरकार घालणार आहे. राज्यशासनाने हमी घेतल्याने बँकांकडून विनातारण कर्ज मिळणार आहे. या योजनेत कोकणातील तरुणांना मोठी संधी आहे.

 कोकणात प्रक्रिया करणारे उद्योग

 कोकणात कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. फळफळाव मोठ्या प्रमाणात आहे. यावर प्रक्रिया करणारे, साठवणूक करणारे उद्योग सुरु करावेत. याखेरीज समूह विकास योजना राबविली जात आहे. यासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध आहेत. उद्योजकांनी एकत्र येऊन काम केल्यास फायदा होईल. अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्य सरकारने चालना दिली आहे. अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग केल्यास त्यासाठी प्रशिक्षण देण्याची शासनाने सोय केली आहे, असे देसाई म्हणाले.

नव्या उद्योजकांसाठी संधी

नव्या उद्योजकांसाठी एमआयडीसी तयार गाळे उपलब्ध करून देणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने तंत्रज्ञान क्षेत्रात अभिनव प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यांना इनोव्हेशन डिस्ट्रिकचा दर्जा दिला जातो. महाराष्ट्रातून रत्नागिरी जिल्ह्याचा यासाठी विचार व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे  देसाई म्हणाले.

याशिवाय रायगड जिल्ह्यातील नवीन एमआयडीसी मंजूर झाली आहे. या ठिकाणी अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत. विशेषतः अभिनव असे फार्मा पार्क या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. कोकणातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला चालना दिली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.