'माझं ठाम मत आहे की आतून सगळे..'; दोन्ही पवारांचा उल्लेख करत राज ठाकरेंचं विधान

MNS Foundation Day Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनादिनानिमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळेस त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना तुफान फटकेबाजी केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 9, 2024, 03:09 PM IST
'माझं ठाम मत आहे की आतून सगळे..'; दोन्ही पवारांचा उल्लेख करत राज ठाकरेंचं विधान title=
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलं विधान

MNS Foundation Day Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. संयम बाळगा असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीचं उदाहरण देताना भाजपाचं आजचं यश हे मोदींचं नाही तर 1952 सलापासून जनसंघाच्या माध्यमातून लढत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे असं सांगितलं. संयम ठेवा एक ना एक दिवस यश नक्की मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरेंनी या वेळेस आपल्यावर जनतेचा विश्वास आहे असं सांगताना सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये खास आपल्या ठाकरी शैलीत टीका केली.

आपल्यावर लोकांचा विश्वास

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनेक आंदोलनं केली आणि ती पूर्णत्वास नेली असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. जे टीका करतात त्यांनी नेमकं कोणतं आंदोलन आम्ही पूर्ण केलं नाही हे सांगावं असं आव्हानही राज ठाकरेंनी दिलं. तसेच आपल्या कामाकडे लोकांचं लक्ष असल्याचंही राज ठाकरेंनी समर्थकांना आवर्जून सांगितलं. "आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहचत आहे. परवा कल्याण-डोंबिवलीला गेलेलो, काल नाशिकमध्ये फिरत होतो. मी नमस्कार केल्यावर अनेक माता-भगिनी दोन्ही बाजूने माझे हात धरतात आणि सांगतात की आता विश्वास तुझ्यावरच आहे," असं राज ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

नक्की वाचा >> 'मी जरांगेंना समोरच सांगितलं की..'; राज ठाकरेंचा खुलासा! म्हणाले, 'मराठा बांधवांना एकच विनंती..'

कोण कुठे आहे कळत नाही

"विश्वास टिकवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. हीच शपथ आपण वर्धापनदिनी घेणं गरजेचं आहे. बाकीच्यांनी जो विश्वास घालवलेला आहे. ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे त्यावरुन कोण कुठे आहे काही कळत नाही. कोणाचं नाव घेतलं तर विचारावं लागतं, कुठे आहे म्हणजे तो?" असं म्हणत राज ठाकरेंनी सध्या राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन टोला लगावला. पुढे बोलाताना राज ठाकरेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करत आतून हे सारे लोक एकच असल्याची शंकाही बोलून दाखवली.

नक्की वाचा >> कोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे 'हा' नेता ठाकरेंची साथ सोडणार?

सगळे आतून एकच

"त्या दिवशी नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आहे. म्हणाले नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. मी म्हटलं बरं, कोणाचे? त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे आणि 2 बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझं अजूनही ठाम मत आहे की आतून सगळे एकच आहेत. फक्त येडे बनवतायेत तुम्हाला. मुर्ख बनवत आहेत. त्यांचं आपआपलं राजकारण सुरु आहे. फक्त महाराष्ट्राची माती होत आहे. मग महाराष्ट्र एक संघ राहू नये म्हणून जातीचं विष पसरवलं जातं," असं राज ठाकरे म्हणाले.