राजू शेट्टींचा काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय

 खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Mar 16, 2019, 09:49 PM IST
राजू शेट्टींचा काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय title=

नाशिक : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदार संघात जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर राजू शेट्टी यांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले. हे प्रयत्न यशस्वी झाले असून खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक येथे शेतकरी मेळाव्यासाठी आले असता शेट्टी यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीने हातकणंगले सोडली आहे. आता काँग्रेस वर्धा किंवा सांगली यातील एक जागा स्वाभिमानीला देणार आहे, असे ते म्हणालेत. 

दरम्यान, आघाडीने देखील जर का शेतकरीविरोधी धोरण अवलंबले तर स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. मोदी सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहे. हुकूमशाही पद्धतीने त्यांचे वागणे सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. बेरोजगारी, जीएसटी यासारखे अनेक मुद्दे भाजप सरकारच्या विरोधात आहेत, त्याचा फायदा आम्हाला निश्चित होईल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव हा आमच्या प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. शेतकऱ्यांनी भरारी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही लढत आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून आहेत ते सुटणार नाही. वंचित आघाडी ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर येईल, अशी आशा असल्याचेही मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

काय म्हणालेत राजू शेट्टी?

- स्वाभिमानी आघाडीसोबत
- आम्ही एकत्रीत भाजपला पराभूत करणार
- संपुर्ण कर्जमुक्ती आणी दीडपट हमीभाव हा कॉमन अजेंडा
- आघाडीत यावर एकमत
- आमची 3 जागांची मागणी होती
- राष्ट्रवादीनं हातकणंगले सोडली
- काँग्रेस,वर्धा किंवा सांगली यातील एक जागा स्वाभिमानीला देणार

छगन भुजबळ काय म्हणालेत? 

- स्वाभिमानीला काँग्रेस एक जागा निश्चित देणार
- शरद पवार साहेब स्वतः हा प्रयत्न करत आहेत
- शेतकरी आत्महत्या वाढल्यात
- सरकारचं धोरण शेतकरी विरोधी
- सन्मान योजना ही अपमान योजना
- संपूर्ण कर्जमाफी आणी दीडपट हमीभाव यावर आमचे एकमत