स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर, सदाभाऊ म्हणतात...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अखेर भाजपसोबत काडीमोड केलाय. 

Updated: Aug 30, 2017, 08:40 PM IST
स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर, सदाभाऊ म्हणतात... title=

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अखेर भाजपसोबत काडीमोड केलाय. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रातल्या एनडीए आणि राज्यातल्या युती सरकारमधून बाहेर पडल्याची घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर हे ४ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवणार आहेत.

या मुद्द्यावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे. तुपकर राजीनाम्यासाठी ४ सप्टेंबरची वाट कशाला पाहात आहेत असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारबाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी प्रश्नावरून सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न राजू शेट्टींनी केला. त्यातच सदाभाऊ खोत यांच्यासोबत वादाची भर पडली. सदाभाऊंना फूस लावून संघटनेत फूट पाडण्यामागे मुख्यमंत्री आणि भाजपचा हात असल्याची आरोप शेट्टींनी केला.