'...मगच माविआचं सरकार पाडलं', अजितदादांचा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Maharastra Politics : महाविकास आघाडी सरकार पडणार याची पूर्वकल्पना अजित पवारांना होती का? यावर आता तानाजी सावंत (Tanaji Sawant On Ajit Pawar) यांनी मोठी खुलासा केला आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 3, 2024, 06:58 PM IST
'...मगच माविआचं सरकार पाडलं', अजितदादांचा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट title=
Maharastra Politics, Tanaji Sawant, Ajit Pawar

Tanaji Sawant On Ajit Pawar : महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पूर्वकल्पना देऊनच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. मी जे काही बोलतो, ते करून दाखवतो. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांना कल्पना दिली अन् अवघ्या दोन महिन्यात सरकार पाडलं, असा दावा तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक सुरू असताना तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. 

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यातील लोणी येथे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत आणि महायुतीचे मान्यवर लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची प्रचार सभा संपन्न झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी 400 खासदारांमध्ये धाराशिवचा खासदार आपला असला पाहिजे, असं म्हणत तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

सावंत -निंबाळकर खडाजंगी

आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. तेरणा कारखान्यातील भंगार चोर असा उल्लेख करत कार्टूनच्या माध्यमातून तानाजी सावंत यांनी ओमराजेंवर निशाणा साधला होता. त्यावर उत्तर देताना राज्यातील 'अ‍ॅम्ब्युलन्स' घोटाळ्यात शेण कुणी खाललं. या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव तानाजी सावंत यांनी जाहीर करावं, असं खुलं आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना दिलं आहे. तुमच्यासारखं भ्रष्ट मार्गानं पैसा कमवला असता, तर आम्ही सुद्धा भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये पालथं पडलो असतो, असं खणखणीत प्रत्युत्तर देतील निंबाळकर यांनी दिलं आहे.

दरम्यान, रोहित पवारांनी देखील तानाजी सावंत यांच्यावर हा हजार कोटी रूपयांचा 'अ‍ॅम्ब्युलन्स' महाघोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर खेकडामंत्री लय बोलायला लागलाय. फडणवीसांनी पवनराजेंच्या हत्याप्रकरणाचा निकाल एका महिन्यात लावावा, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.