बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द

 येवला (Yeola) तालुक्यातील बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत  ( Katrani Gram Panchayat) निवडणूक रद्द (KatraniGram Panchayat election cancel) करण्यात आली आहे.  

Updated: Jan 29, 2021, 11:15 AM IST
बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द   title=

मुंबई / नाशिक : येवला (Yeola) तालुक्यातील बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत  ( Katrani Gram Panchayat) निवडणूक रद्द (KatraniGram Panchayat election cancel) करण्यात आली आहे. उमरणे ग्रामपंचायतनंतर कातरणी नाशिक  (Nashik) जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत आहे. 21 लाख रुपयांचे लिलाव झाल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग पुढे आले आहे. लिलाव प्रक्रिया झाल्याच्या तक्रारीनंतर तपासात निष्पन्न झाल्याने निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कठोर कारवाईबाबत जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांना निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.

कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, याबाबतची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार आली होती. या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांच्या 11 जागांसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान नियोजित होते. मात्र प्राप्त तक्रारीवरून सर्व 11 जागांवर लिलावाच्या माध्यमातून सकृतदर्शनी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आयोगाने हे निकाल घोषित करण्यास मनाई केली होती.

ग्रामपंचायत निवडणूक लिलावाच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली होती. निवडणूक आयोगाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदींचे अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिफितीमधील संभाषणाचे आयोगाने अवलोकन केले. यात तथ्य आढळून आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे प्रकरण 9-अ नुसार अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे, मदान यांनी सांगितले.

इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार कातरणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी मिळू शकलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. स्वतंत्रपणे नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असेही मदान यांनी स्पष्ट केले.