रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; आयुष्यातील शेवटची पिकनिक ठरली

धबध्बयावर फिरायला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा या पावसाळी सहली जीवावर बेतू शकतात. रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. 

Updated: Aug 7, 2023, 10:46 PM IST
रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; आयुष्यातील शेवटची पिकनिक ठरली title=

raigad ghagarkond waterfall : वर्षा पर्यटन सहली या जीवावर बेतत आहेत. रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला आहे.  पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण धबधब्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या धबधब्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, येथे पर्यटनाचा आनंद घेताना खोमतीही खबरदारी घेतली जात नाही. यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. 

घागरकोंड धबधबा हा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे. या धबधब्यावरील कुंडात बुडून काळीज येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. स्मित घाडगे असे मृत तरुणाचे नाव आहे. स्मित हा आपल्या काही मित्रांसह पावसाळी पर्यटनासाठी येथे आला होता. कुंडात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. एडवेंचर सोलच्या बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला.

मकर धोकडा तलावात दोन तरुण बुडाले

नागपूरच्या जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोन तरुण बुडाले आहेत. दुपारी दोन वाजताच्या सुमारास मकरधोकडा तलावात दोन तरुण पोहण्यासाठी गेले. यावेळी ही घटना घडली आणि दोघे जण तलावात बुडाले. राहुल भगत (वय 27) आणि आयुष सातपुते (वय 25) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही बेसूर येते राहणारे आहेत. 

अकोलेच्या हरिश्चंद्र गडावर एका पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू

अकोलेच्या हरिश्चंद्र गडावर एका पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाला आहे. 1 ऑगस्टला सहा पर्यटक डोंगरावर चढण्यासाठी पुण्यावरून आले मात्र दाट धुक्यामुळे ते रस्ता भरकटले. त्यांनी तोलार खिंडीतून गडावर चढण्यास सुरूवात केली.  मात्र, दोन दिवस गडावर अडकून पडल्याने आणि थंडीमुळे त्यांच्यापैकी चौघांची प्रकृती खालावत गेली आणि यातच एकाचा मृत्यू झाला. तर तीघांवर उपचार सुरू आहेत.  

मावळमधील कुंडमळा परिसरात बंदी असतानाही पर्यटकांची तोबा गर्दी

मावळमधील कुंडमळा परिसरात बंदी असतानाही पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. पुणे तसंच पिंपरी चिंचवडकरांचं प्रमुख आकर्षण असलेल्या कुंडमळा धबधब्यावर जाण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातली आहे. सेल्फी काढताना या धबधब्यात पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. इथं इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय. हा धबधबा धोकादायक असल्यानं पर्यटकांना इथं जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. मात्र तरीही पोलिसांचा डोळा चुकवून अनेकजण धोकादायक पर्यटन करत आहेत.