'तुमची किंमत चटणी इतकी पण नाही' नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Narayan Rane PC : 'बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे, मातोश्रीवर काय चालतं हे मला सगळं माहित आहे' असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

राजीव कासले | Updated: Apr 2, 2024, 06:18 PM IST
'तुमची किंमत चटणी इतकी पण नाही' नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल title=

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रुद्राक्ष फेकून दिले, मला मातोश्रीमधलं सगळं माहित आहे, पण मी अजून सांगितलेलं नाही, ळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे, मी कुठल्याच ठाकरेंबद्दल वाईट काही करणार नाही असं बाळासाहेबांना सांगितलं होतं, म्हणून मी शांत आहे, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहाणार नाहीत अशी टीकाही नारायण राणे यांनी केलीय. 

इंडिया आघाडीच्या दिल्लीत रामलीला मैदानात झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी पीए मोदी आणि अमित शाहांवर टीका केली. त्या सभेला उद्धव ठाकरेही हजर होते. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले नाही पण विरोधी आघाडीच्या सभेला दिल्लीला जातात. उद्धव ठाकरेंचे 5 खासदर आणि 16 आमदार आहेत,  येत्या निवडणूकीत त्यांचे 10 आमदारही राहणार नाहीत, असं राणे यांनी म्हटलंय. तुमची बौद्धिक लायकी काय ? तुमची किंमत चटणी इतकी पण नाही असा हल्लाबोलही राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीवर खालच्या भाषेत टीका केली. भाजपाला तडीपार करायची भाषा उद्धव ठाकरेंनी केली. पण आमची देशात आणि राज्यात सत्ता आहे. ज्यांनी कोरोनाकाळात पैसा खाल्ला त्यांना आम्ही तडीपार करु असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे. यावेळी उद्धव ठाकरें याचा एकेरी शब्दात उल्लेख करत उद्धव ठाकरेची मानसिक स्थिती बिघडली आहे, तुझी लायकी आहे का? अशी टीका राणेंनी केली.

कोरोनाकाळात सगळी माध्यमं पिछाडीवर होती, त्या काळात सामना मात्र नफ्यात होता, काळापैसा पांढरा करण्याचे हे काम होतं. कोरोनाकाळात मोदींनी 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं. भाजप ठगांचा पक्ष मग वर्षानुवर्षे आमच्या सोबत राहिल्याने तू पण ठग झालास का ? असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरें विचारल आहे. देवेंद्र फडणवीस नुकतेच लडाखला जाऊन आले, फडणवीस पक्ष सांगेन तिथं जाउज येतात, फडणवीसांनी तुम्हाला पाच वर्षे सांभाळलं ते कसं हे मला माहित आहे, असंही राणे यांनी म्हटलंय.

यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत पक्षाशी प्रामाणिक नाही. शिवसेना संपवण्यात राऊतांचा हात होता, असा आरोप राणे यांनी केलाय. अमेरिका, इटलीचे राष्ट्रप्रमुख पीएम मोदींचं कौतुक करतात, देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणण्यात मोदींना यश आलं आहे. देशात गरिबांसाठी 54 योजना आणल्या. पण तू मुख्यमंत्री असताना जनतेला आणि गरिबांना काय दिलंस? असा सवालही राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारलाय.

उमेदवारी पक्ष ठरवतील
यावेळी बोलताना नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवेल असं स्पष्ट केलं. उमेदवार पक्ष ठरवेल, कुणी लुडबूड करु नये असा टोला नारायण राणे यांनी उदय सामंत यांचं नाव न घेता लगावला. माझं नाव जाहीर झाल्यास मी निवडणूक लढवले आणि जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.