Sanjay Raut : महाराष्ट्र महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही : संजय राऊत

घटानात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने बाबासाहेब आबेंडकरांचा अपमान करावा, त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करावी, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. 

Updated: Dec 16, 2022, 04:45 PM IST
 Sanjay Raut :  महाराष्ट्र महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही : संजय राऊत  title=

मुंबई :  राज्याचे गृहमंत्री हे लोकशाही मानणारे गृहस्थ आहेत. आणीबाणी (Emergency) विरुद्ध तरुणपणात त्यांनी संघर्ष केल्याचं ते सांगतात. आमचीही लढाई अशाच प्रकारच्या आणीबाणीविरोधात सुरु आहे. त्यामुळे विशेषत: महाराष्ट्रावर अन्याय सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अवमान सुरु आहे. कर्नाटकचे मंत्री सीमाप्रश्नी (Maharashtra Karnataka Border  Dispute) महाराष्ट्राचा रोज अपमान करतायेत. महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात आहेत. या विरोधात महाराष्ट्रप्रेमी महामोर्चा काढत आहेत. महाविकास आघाडीचा (MVA) शनिवारी 17 डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्रकारांशी संवाद साधत होते. या दरम्यान ते बोलत होते. (mp sanjay raut appeal to maharashtra government minister to include in mva mahavikas agahdi march) 

राऊत काय म्हणाले?  

"सरकारमधल्या महाराष्ट्रप्रेमींनीही या मोर्च्यात यावं, असं माझं आवाहन आहे. सरकारमधील महाराष्ट्रप्रेमींनी सहभागी होऊन आपली निष्ठा दाखवून द्यावी", असं आवाहन राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांना केलं. 

"महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचा उद्या बुलंद आवाज उद्या दिसणार. कुणालाही मान्य नाही की राजभवनात बसून घटनात्मक पदावरील व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंचा अपमान करावा. घटानात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने बाबासाहेब आबेंडकरांचा अपमान करावा, त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करावी, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण हे तिघेही महाराष्ट्राचे सुपुत्र आहे. त्यांचा महाराष्ट्राच्या मातीशी नातं आहे. त्यानंतर ते विश्वाचे झाले. पण महाराष्ट्राचा आत्मा आहे तो म्हणजे हे 3 नेते आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मा हे सर्व कसं सहन करेल", असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 

राऊतांनी महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांचा मुद्दाही आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 4 लाख कोटीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. गेल्या 2 महिन्यातील हे सर्व प्रकरण आहे. या प्रकल्पामुळे राज्यात 2 ते अडीच लाख लोकांना रोजगार मिळाला असता. प्रकल्प गुजरात निवडणुकीमुळे हिरावून घेण्यात आला", असा गंभीर आरोप राऊतांनी केला.

"कर्नाटकमध्ये 20-25 लाख मराठी बांधवांवर अत्याचार सुरु आहे. वर महाराष्ट्रातील गावांवर दावा सागंण्याचा एक प्रकार कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे", असंही राऊतांनी नमूद केलं.