Mumbai News : मुंबईतील 'या' उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात जाल तर दंड होणार !, स्पीड लिमिट करणार चेक

Mumbai News : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील पुलावरुन भरधाव वाहने चालवल्यास पालिकेकडून रोख दंड वसूल केला जाणार आहे.  या ठिकाणी वाढलेले अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 12, 2023, 03:38 PM IST
Mumbai News : मुंबईतील 'या' उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात जाल तर दंड होणार !, स्पीड लिमिट करणार चेक  title=

Mumbai News : मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात जाल तर मुंबई पालिकेकडून दंड वसूल केला जाणार आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यासाठी 50 लाख रुपये खर्च करून उड्डाणपुलावर ‘स्पीड व्हायलोशन डिटेक्शन सिस्टम’ बसविण्यात येणार आहे. या सिस्टिमद्वारे उड्डाणपुलावर बसविण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामुळे भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांची स्पीड लिमिट तपासली जाणार आहे. तर वेगमर्यादा पार केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला आहे. 

या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी निर्णय

घाटकोपर-मानखुर्द लिंक पुलावरुन भरधाव वाहने चालवताना खबरदारी घ्या. अन्यथा पालिकेकडून रोख दंड वसूल केला जाणार आहे. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. घाटकोपरवरुन वाशी, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड बनवण्यात आला आहे. दरम्यान,  या पुलामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता आणि पूर्व मुक्त मार्गावरुन येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी फोडण्यास मदत होणार आहे.

अवजड वाहने आणि दुचाकी वाहनांसाठी बंद 

घाटकोपर, मानखुर्द लिंक रोड फ्लायओव्हरवर मुंबई पालिका स्पीड व्हायलेशन डिटेक्टर बसवणार आहे. वाहतूक पोलीस मुख्यालयात वेगाचे उल्लंघन करण्यासाठी सध्याच्या केंद्रीय नियंत्रण सॉफ्टवेअरसोबत स्पीड व्हायोलेशन डिटेक्शन सिस्टीमचे एकत्रीकरण केले जाईल. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हा उड्डाणपूल अपघातप्रवण असल्याने अवजड वाहने आणि दुचाकी वाहनांसाठी बंद आहे.

घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर परिसरात फोडण्यात यश, पण..

दरम्यान, पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर परिसरात होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरच वाहतूककोंडी होऊ लागली. त्यावर उपाय म्हणून या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मात्र, या मार्गावरुन सुस्साट वाहने दामटवण्यात येत आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. याला आळा घालण्यासाठी मुंबई पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

 घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाला 500 कोटींहून अधिक खर्च

घाटकोपर-मानखुर्द लिंक मार्गावरील पूलअनेक वर्षांपासून रखडलेला होता. हा पूल मागील वर्षी खुला करण्यात आला असून त्यास 500 कोटींहून अधिक खर्च आला आहे. दरम्यान, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड हा शीव-पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गांना जोडणारा मुख्य रस्ता आहे.

तर दुसरीकडे मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.  पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.  हायवेवर तासनतास वाहने पुढे सरकत नसतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.