मोदीजी, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच मेले ! नाना पटोले यांचा घणाघात

'सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच, नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच'

Updated: Jan 3, 2022, 05:41 PM IST
मोदीजी, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच मेले ! नाना पटोले यांचा घणाघात title=

मुंबई : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (meghalaya governor satya pal malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) खरा चेहरा देशासमोर आणला असून सत्यपाल मलिक यांनी मोदींबदद्ल जे सांगितले, ते तथ्यच आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान 700 शेतकरी मेले हे तुमच्यामुळेच, तुम्हीच शेतकऱ्यांचे मारेकरी आहात, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

सत्यपाल मलिक यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. सध्या भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचे धाडस कोणामध्येही नाही. मोदींच्या मंत्रीमंडळातील सहकारी तसंच भाजपाचे सर्व नेते मोदीसमोर मान खाली घालून गप्प बसतात. 

सत्यपाल मलिक यांनी मात्र धाडस करून सत्यकथन केलं आहे. याआधीही मलिक यांनी शेतकरी आंदोलन व कृषी कायद्यांबद्दल परखड मत व्यक्त केलं होतं. शहीद शेतकऱ्यांबद्दल मोदींचे वक्तव्य हे संतापजनक आहे. एवढा निष्ठूर, निर्दयी व्यक्ती आमच्या देशाचा पंतप्रधान आहे हे दुर्दैव आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवळा असण्याचं कारणच नाही, तसं असतं तर शेतकऱ्यांची रक्तबंबाळ होईपर्यंत डोकी फोडली नसती, खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला नसता, शेतकऱ्यांच्या मार्गात लोखंडी खिळे ठोकले नसते, शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडून मारणाऱ्याला अभय दिलं नसतं, अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली आहे.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा थोडा आदर्श राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घ्यावा. केंद्र सरकार व भाजपाच्या इशा-यावर काम करणे त्यांनी बंद करावे. राज्यपालांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. सत्याची बाजू घ्यावी, संविधानाच्या तत्वानुसार काम करावे. तुमच्या कामाचे मुल्यमापन इतिहास करेल तेव्हा आपण काय आदर्श ठेवणार आहोत याचा विचार करावा, अशी कोपरखिळी पटोले यांनी कोश्यारी यांना मारली.