औरंगाबाद पालकमंत्री पदावरुन रामदास कदम यांची उचलबांगडी

शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षातील नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येत आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2018, 11:40 PM IST
औरंगाबाद पालकमंत्री पदावरुन रामदास कदम यांची उचलबांगडी title=

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षातील नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन हटविण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

पालकमंत्री बदलण्याचा निर्णय

राज्य शासनाने तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. रामदास कदम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदावरु का हटविले, याची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेच्या निर्णयानंतरच त्यांना पदावरुन दूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना का हटविले याची चर्चा सुरु आहे.

डॉ. दीपक सावंत यांच्याकडे धुरा

शासनाच्या या निर्णयानुसार औरंगाबादचे पालकंमत्रीपद रामदास कदम यांच्याकडून काढून घेऊन ते डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. कदमांची ही उचलबांगडी चर्चेचा विषय झालाय. औरंगाबादच्या नामांतरावरून खासदार चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यात वाद झाला होता. या वादावरुन त्यांना हटविल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच भाजपवरही कदम यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे ही नाराजी नडल्याचे म्हटले जातेय.

रामदास कदम काय निर्णय घेणार?

खैरे यांच्यातील वादानंतर रामदास कदम यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामदास कदम यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता रामदास कदम काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेय. किंवा पक्षा त्यांच्याकडे नवी जबाबदारी सोपणार का, याचीही चर्चा सुरु झालेय.