'भीकेची गरज नाही' वादावर विनोद तावडेंकडून, खासदार संभाजी महाराजांना खलिता

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यावरून विनोद तावडेंवर टीका केली होती.

Updated: Aug 20, 2019, 09:05 PM IST
 'भीकेची गरज नाही' वादावर विनोद तावडेंकडून, खासदार संभाजी महाराजांना खलिता title=

मुंबई : उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यावरून विनोद तावडेंवर टीका केली होती. 'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही.' असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं होतं.

या टीकेला आता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर दिलं आहे. ही भीक नाही, तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. 

खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी? विनोद तावडेंचा सवाल

विनोद तावडे म्हणतात, 'बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे.' 

जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे - विनोद तावडे

या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून या सर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि... म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भीक नको'; संभाजीराजेंची तावडेंवर टीका

गोर-गरीब जनतेचा मदतीसाठी खारीचा वाटा - विनोद तावडे

गोर-गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले १०-१० रुपये मिळून ३.५० लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले २४.५० लाख रुपये, अशी एकूण २८ लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हां सर्वांना माहीत आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणात मदतनिधी राष्ट्रवादीला पाहावली नाही- विनोद तावडे

राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. 

याविषयी मला दु:ख आणि खंत - विनोद तावडे

पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजी राजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे. आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते.