छोड आये हम वो गलीयाँ...

सरकारने टीम अण्णांचे प्रमुख सदस्य अरविंद केजरीवाल यांनी इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस सोडल्यानंतर अखेरीस सहा वर्षांनी राजीनामा मंजुर केला आहे. केजरीवाल यांनी त्यासाठी नऊ लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर ४५ दिवसांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

Updated: Dec 22, 2011, 07:41 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

 

सरकारने टीम अण्णांचे प्रमुख सदस्य अरविंद केजरीवाल यांनी इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस सोडल्यानंतर अखेरीस सहा वर्षांनी राजीनामा मंजुर केला आहे. केजरीवाल यांनी त्यासाठी नऊ लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर ४५ दिवसांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.केजरीवाल यांनी सांगितलं की आयकर विभागाने त्यांच्या राजीनाम्याचा अखेरीस स्वीकारला आहे. या संदर्भातले पत्र केजरीवाल यांना मंगळवारी मिळालं.

 

केजरीवाल यांनी २००६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात आयआरएसमधून राजीनामा दिला होता. त्यावेळेस ते आयकर विभागात सह आयुक्त होते. त्यांनी खात्याला भरलेल्या रक्कम परत मिळावी यासाठी न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं होतं. केजरीवाल यांनी तीन नोव्हेंबरला पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्र लिहून ९,२७,७८७ रुपये खात्याला भरल्याचं कळवलं होतं. पंतप्रधान यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आपल्याला हे पैसे उधार देणाऱ्या सहा मित्रांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं लिहिलं होतं. केंजरीवाल हे १९९५ सालच्या आयआरएस बॅचचे अधिकारी आहेत. केजरीवाल यांनी पूर्ण पगारावर अभ्यास रजेवर गेल्याने त्यांना नोकरी सोडण्याआधी तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणं नियमानुसार अनिवार्य होतं. त्यांनी त्याआधीच सेवेचा राजीनामा दिल्याने त्यांना खात्याला पैसे भरणे आवश्यक होतं. तर केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पगार ने घेता अभ्यासासाठी रजा घेतली होती आणि त्यांनी बाँडच्या सर्व अटी पूर्ण केल्या होत्या.

 

मुख्य आयकर आयुक्त यांनी केजरीवाल यांना 9,27,787 रुपयांचा भरणा करण्यासाठी नोटीस बजावली होती. केजरीवाल यांनी सरकार आपल्यावर आंदोलनात सहभागी झाल्याने आकसापोटी कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. अखेरीस आता या प्रकरणार पडदा पडला आहे.