युतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात

लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 19, 2014, 12:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सुमारे पंधरा लाख मते मिळाली होती तर यावेळी अवघी सात लाख मतं मिळाली असून मनसेचे निम्म्याहून अधिक मतदार हे शिवसेना-भाजपकडे परत वळल्याचं दिसून येतंय. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १८.२ टक्के मतं मिळाली होती तर यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के वाढ होऊन ती २७.५७ टक्के एवढी वाढ झाली आहेत.
त्यातुलनेत शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत चार टक्केच वाढ झाली आहे. शिवसेनेला यावेळी २०.८२ टक्के मतं मिळाली. अर्थात सेनेच्या मतांच्या टक्केवारीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली नसली तरी जागा मोठय़ा संख्येनं जिंकल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जागा १७ वरून दोन एवढय़ा कमी झाल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत १.४ टक्के एवढाच फरक झालेला आहे. काँग्रेसला गेल्या लोकसभेत १९.६ टक्के मते मिलाली होती तर यावेळी १८.२९ टक्के एवढी मते मिळाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण चार टक्के झाली आहे. त्याचवेळी मनसेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत रकम जप्त होण्याची नामुष्की ओढावली असून लाखभर मतंही मिळवणं मनसेच्या उमेदवारांना शक्य झालेलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सुमारे चार टक्के म्हणजे पंधरा लाख मतं मिळाली होती. यावेळी मनसेला अवघी १.४७ टक्के मतं मिळाली आहेत.
ज्या नाशिकवर मनसेची भिस्त होती तिथं तर मनसेचं पुरतं पानिपत झालं. ठाणे लोकसभेतही गेल्यावेळी राजन राजे यांना सुमारे दीड लाख मतं मिळाली होती तर यावेळी अवघ्या ४८ हजार मतांवर समाधान मानावं लागलंय. लोकसभा निवडणुकीतील निकालांवरून मनसेची मतं पुन्हा शिवसेना-भाजपाकडे वळल्यामुळं विधानसभा निवडणुकीत मनसेपुढं मोठं आव्हान निर्माण झाल्याचं मनसेच्या आमदारांचंही म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.