आशिया कपनंतर पहिल्यांदाच : भारत X पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मैदानावरील खुन्नस पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

Updated: Dec 25, 2012, 08:08 AM IST

www.24taas.com, बंगळूरु
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मैदानावरील खुन्नस पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाक यांच्यातील पहिली टी-२० मॅच बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणार आहे. आशिया कपनंतर प्रथम या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील प्रतिष्ठेची लढत चाहत्यांना अनुभवयाला मिळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचेसमध्ये नेहमीच दोन्ही देशांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या या मॅचेस क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरते. आता, आशिया कपनंतर प्रथमच या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये मुकाबला होणार आहे. तर २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारी पहिली सीरिज... दोन्ही टीम्स या जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहेत. इंग्लंडविरुद्ध मुंबईमध्ये झालेली टी-२० गमावल्याने नंबर वनच्या रेसमधून आऊट झालेली धोनी अॅन्ड कंपनीला पाकवर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. भारतीय बॅट्समन आणि पाक बॉलर्स असा मुकाबला या निमित्ताने रंगणार आहे. बॉलिंग ही टीम इंडियाची कमकुवत बाजू आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हार्ड हिटिंग बॅट्समनना रोखण्याचं मोठ आव्हान भारतीय बॉलर्ससमोर असेल.
उमर गुल, सोहेल तन्वीर आणि सईट अजमल या पाकिस्तानच्या बॉलर्सचा सामना टीम इंडियाला करावा लागणार आहे. उमर अकमल, कामरान अकमल आणि नासिर जमशेद या पावरफुल बॅट्समनपासून टीम इंडियाला सावध रहावं लागेल. शाहीद आफ्रिदी या ऑलराऊंडरचाही टीम इंडियाला मोठा धोका असणार आहे. आता टी-२० मध्ये नेहमीच पाकवर भारी पडणारी टीम इंडिया या मॅचमध्येही पाकपेक्षा सरस ठरते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.