सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय

खालच्या कोर्टाचा निर्णय बाजुला सारत हायकोर्टानं अभिनेता सलमान खान याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.

Updated: Dec 10, 2015, 03:47 PM IST
सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय title=

मुंबई : अखेर, सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा निकाल आज उच्च न्यायालयानं जाहीर केलाय. यावेळी, खालच्या कोर्टाचा निर्णय बाजुला सारत हायकोर्टानं अभिनेता सलमान खान याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, या हाय प्रोफाईल प्रकरणात सलमानला निर्दोष सोडणं हा 'अन्याय' असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीय. यावर, कोर्टाच्या निकालाची प्रत हाती पडल्यानंतरच पुढे काय पावलं उचलायची याचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिलीय. तर, सलमान खान सुटला तर नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी प्रतिक्रिया वकील आभा सिंग यांनी व्यक्त केली होती. 

अधिक वाचा - निकाल ऐकताच सलमान हमसून हमसून रडला!

सकाळी कर्जतहून निघालेला सलमान निकालाआधी काही वेळ अगोदर न्यायालयासमोर हजर झाला होता. निर्णय जाहीर झाल्यानंतर सलमान खान कोर्टाबाहेर निघून आला. मात्र, यावेळी त्याला त्याच्या भावना आवरणं कठिण झालं आणि तो रडू लागला. त्याच्या बहिणीच्या आणि स्टाफच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.

हायकोर्टानं निकाल देताना सलमानला दोषी ठरवण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयानं म्हटलंय. उपलब्ध पुराव्यांच्या आधारातून सलमानला दोषी ठरवता येणार नाही, असं यावेळी हायकोर्टानं म्हटलंय.

अधिक वाचा - 'रवींद्र पाटील यांचा जबाब ग्राह्य धरता येणार नाही'

सलमान हिट अॅन्ड रन प्रकरणी पोलिसांनी तपासात 'जाणीवपूर्वक' त्रुटी ठेवल्या, असं निरीक्षणही यावेळी हायकोर्टानं नोंदवलंय. खालच्या कोर्टात सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु, हा निर्णय फेटाळून लावत हायकोर्टानं सलमानला निर्दोष घोषित केलंय. 

निकालासाठी सलमानची बहिण अलविरा, अर्पिता आणि बॉडीगार्ड शेरा सकाळीच कोर्टात हजर झाले होते. 

अधिक वाचा - सलमान हिट अॅन्ड रन : दारुबिल पुरेसा पुरावा नाही : कोर्टाचे निरीक्षण 

सलमान खान हिट एण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी निकाल वाचन पूर्ण झाले. न्यायालयाने निकालवाचनादरम्यान काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. सुनावणी दरम्यान रवींद्र पाटील यांची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. शिवाय रविंद्र पाटील यांनी दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी सलमान खानवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला. पण रविंद्र पाटील यांनी दिलेला जबाब हा मॅजीस्ट्रेट समोर दिला होता. तर सत्र न्यायालयात सुरु असलेल्या साक्षी दरम्यान तो गैरहजर राहिला.

दरम्यानच्या काळात त्यांना निलंबित करण्यात आलं. शिवाय तो फरार होता आणि त्याचा मृत्यू कधी झाला हे पोलिसांना माहित देखील नव्हते, असंही कोर्टानं म्हटलंय. आता सलमानचं भवितव्य काय असेल, याचा फैसला आज होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.