मंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!

भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 27, 2012, 04:04 PM IST


www.24taas.com, मुंबई


भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.

 

स्ट्ररल ऑडिटिंग करण्यासाठी स्थापत्यतज्ज्ञ हिमांशू राजे यांच्या नेतृत्वात एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने दोन दिवसांच्या पाहणीनंतर आज रात्री आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला.

चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारण सुरक्षित असले तरी त्यांचे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आणि कोअर टेस्ट घ्यावी, अशी शिफारस समितीने केली आहे. सातवा मजला हे पक्के बांधकाम नाही, तेथे केवळ शेड उभारलेले आहेत. सहाव्या माळ्यावरून पाणी झिरपू नये म्हणून मान्सून शेड बांधण्याची सूचना समितीने केली आहे.

 

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला होता.

 

मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांशी मी चर्चा केली. माझ्याकडून मी दोन प्रस्ताव त्यांना दिले. एक म्हणजे तातडीची व्यवस्था आणि दुसरी कायम स्वरूपाची योजना करावी असे सांगितले होते. तातडीच्या व्यवस्थेत येत्या ४८ तासात सर्व प्रशासकीय यंत्रणा सुरू झालेलं आहे, हे लोकांना दिसलं पाहिजे. तातडीचे उपाययोजना करण्यासाठी जागेचा प्रश्न मोठा आहे. जीटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम तयार आहे. एअर इंडियाच्या इमारतीत काही ऑफिस रिकामे आहेत. अजून आजूबाजूला जागा रिकाम्या आहेत. तसेच माननीय विधीमंडळ अध्यक्ष आणि सभापतींची परवानगी घेऊन विधीमंडळातील चेंबर वापरण्याची परवानगी घ्यावी. ही झाली तातडीची यंत्रणा पण कायम स्वरूपी योजना करणेही गरजेचे आहे.

 

कायम स्वरूपी योजनेचे उपाय योजना करताना महाराष्ट्र सरकार आणि खासगी स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून मंत्रालयाच्या वास्तुची चौकशी करणं गरजेचं आहे. या वास्तुला ५० वर्षांपेक्षा अधिकचा कालखंड झालेला आहे. काल केंद्राच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या लोकांशी मी चर्चा केली. त्यांनी मंत्रालयाच्या वास्तुची पाहणी न करता सांगितले, की कोणत्याही इमारतीत ६ ते ८ तास आग लागली तर त्यात बेसिक डिफेक्ट आहे, हे लक्षात येते. त्यात तुम्हाला दीर्घकालाचा विचार करावाच लागेल. पण आम्ही बघितल्याशिवाय सांगणार नाही. आम्ही आमच्या अनुभवावरून सांगत आहोत, डिजास्टर मॅनेजमेंटच्या लोकांनी स्पष्ट केल्याचे पवार यांनी सांगितले होते.

 

मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या आर्किटेक्चरांची चर्चा करावी आणि दीर्घकालीन नियोजन कसे करावे, याचा विचार करावा, असा सल्लाही पवार यांनी दिला होता.