न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच भारत जिंकला टी-20 मॅच

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.

Updated: Nov 2, 2017, 05:05 PM IST
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच भारत जिंकला टी-20 मॅच title=

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा हा पहिलाच टी-20मधला विजय आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७ टी-20 पैकी ५ मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. तर २०१२ साली विशाखापट्टणममधली टी-20 रद्द करण्यात आली होती.

याआधी २००७च्या टी-20 वर्ल्ड कप, २००९ सालच्या न्यूझीलंड दौऱ्यावेळची २ मॅचची टी-20 सीरिज, २०१२ सालची चेन्नईमध्ये झालेली टी-20 आणि वर्ल्ड टी-20वेळी नागपूरमध्ये झालेल्या मॅचमध्ये भारताचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला होता. 

भारतानं ठेवलेल्या २०३ रन्सचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २० ओव्हर्समध्ये १४९/८ एवढा स्कोअर करता आला. युझुवेंद्र चहाल आणि अक्सर पटेलनं न्यूझीलंडच्या दोन विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली. शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या आशिष नेहराला एकही विकेट मिळाली नाही. नेहरानं ४ ओव्हरमध्ये २९ रन्स दिल्या.

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होत असलेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवननं १५८ रन्सची पार्टनरशीप केली. शिखर धवननं ५२ बॉल्समध्ये ८० तर रोहित शर्मानं ५५ बॉल्समध्ये ८० रन्स केल्या. तर विराट कोहलीनं ११ बॉल्समध्ये नाबाद २६ आणि धोनीनं २ बॉल्समध्ये नाबाद ७ रन्स बनवले. वनडे सीरिज २-१नं जिंकल्यानंतर आता ३ मॅचच्या टी-20 सीरिजमध्ये भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे.