'बोर्डमधील लोकांना मी प्रशिक्षक व्हावे असे वाटत नव्हते', रवी शास्त्रींचा मोठा खुलासा

 त्यावेळी रवी शास्त्रीही या शर्यतीत सहभागी झाले होते.

Updated: Dec 10, 2021, 02:50 PM IST
'बोर्डमधील लोकांना मी प्रशिक्षक व्हावे असे वाटत नव्हते', रवी शास्त्रींचा मोठा खुलासा title=

मुंबई : रवी शास्त्री यांनी काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरुन राजीनामा दिला होता. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेच्या जागी शास्त्री यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले. प्रशिक्षक म्हणून अखेरच्या टी-20 विश्वचषकात दिसलेल्या शास्त्री यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) काही लोकांना आपण प्रशिक्षक व्हावे असे वाटत नव्हते. रवी शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

 रवी शास्त्री म्हणाले, 'बीसीसीआयमधील काही लोकांनी असे प्रयत्न केले होते, जेणेकरून मला (कोच) ही जबाबदारी मिळू नये'. डंकन फ्लेचर यांनी पद सोडल्यानंतर अनिल कुंबळे यांच्याकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते. त्यावेळी रवी शास्त्रीही या शर्यतीत सहभागी झाले होते. त्यानंतर शास्त्रींच्या तुलनेत अनिल कुंबळेला प्राधान्य देण्यात आले.

त्यानंतर विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर कुंबळे यांनी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर दोन दिवसांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. रवी शास्त्री म्हणाले, 'माझ्या दुसऱ्या कार्यकाळात मोठा वाद निर्माण झाला होता, त्यावेळी त्यांनी दुसऱ्या कोणाची तरी निवड केली होती, पण 9 महिन्यांनंतर त्यांना पुन्हा माझ्याकडे यावे लागले, ही गोष्ट त्या लोकांसाठीही लाजिरवाणी बाब होती, ज्यांनी मला ही नोकरी मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. 

रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्यापूर्वी ते इंडियन टीमसाठी निर्देशक म्हणून काम करत होते.

शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. यादरम्यान भारतीय संघाने सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि यावर्षी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.

याशिवाय भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

T20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचा महान फलंदाज राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्या परदेश दौऱ्यावर जात आहे. टीम इंडिया डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत 3 कसोटी आणि 3 वनडे खेळणार आहे.