IPL 2019: विश्रांतीनंतर मुंबई पुन्हा मैदानात, चेन्नईमध्ये कसून सराव

मोठ्या विश्रांतीनंतर मुंबईच्या टीमने पुन्हा एकदा कसून सराव करायला सुरुवात केली आहे.

Updated: Apr 25, 2019, 08:52 PM IST
IPL 2019: विश्रांतीनंतर मुंबई पुन्हा मैदानात, चेन्नईमध्ये कसून सराव title=

चेन्नई : मोठ्या विश्रांतीनंतर मुंबईच्या टीमने पुन्हा एकदा कसून सराव करायला सुरुवात केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबईच्या खेळाडूंनी घाम गाळला. जवळपास आठवड्यानंतर शुक्रवारी मुंबईची टीम पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. याआधी मुंबई शनिवारी राजस्थानविरुद्ध खेळली होती. या सामन्यात त्यांचा ५ विकेटने पराभव झाला होता. या मॅचनंतर आता मुंबईचा सामना सहा दिवसानंतर होणार आहे.

मुंबईच्या खेळाडूंना आराम मिळावा, तसंच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा यासाठी मुंबईच्या टीमने खेळाडूंना ४ दिवस विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. या विश्रांतीनंतर मुंबईची टीम सरावासाठी मैदानात उतरली.

'खेळाडू आमची प्राथमिकता आहे. यासाठी त्यांना बॅट आणि बॉलपासून लांब राहायला सांगण्यात आलं आहे. फक्त रोहित, हार्दिक आणि बुमराहच नाही तर क्विंटन डिकॉक, लसिथ मलिंगा यांच्यासारखे अन्य खेळा़डूही त्यांच्या देशाकडून वर्ल्ड कप खेळणार आहेत. सगळ्या खेळाडूंना वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करता यावी, याची काळजी आम्ही घेत आहोत. बहुतेक परदेशी खेळाडू चेन्नईला जाऊन सुट्टीचा आनंद लुटत आहेत, तर भारतीय खेळाडू स्वत:च्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत,' असं मुंबई टीमच्या सूत्रांनी सांगितलं.

रोहितच्या मुंबईचा सामना धोनीच्या चेन्नईशी शुक्रवारी होणार आहे. रात्री ८ वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. याआधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये मुंबईने चेन्नईवर ३७ रननी विजय मिळवला होता. याची पुनरावृत्ती करण्यासाठी मुंबईची टीम पुन्हा मैदानात उतरेल.

पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर सध्या चेन्नईची टीम पहिल्या आणि मुंबईची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या ११ पैकी ८ मॅचमध्ये विजय मिळवला, तर ३ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईच्या खात्यात सध्या १६ पॉईंट्स आहेत. यामुळे प्ले ऑफमधला त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.

जास्तीत जास्त मॅचमध्ये विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न चेन्नई करेल, कारण पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहिलं तर फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दोन संधी टीमला मिळतात. क्वालिफायर मॅचमध्ये पराभव झाला, तरी एलिमिनेटर मॅचमध्ये विजय मिळवून फायनल गाठायची संधी पॉईंट्स टेबलमधल्या पहिल्या दोन टीमना असते.

दुसरीकडे मुंबईने खेळलेल्या १० मॅचपैकी ६ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर ४ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या खात्यामध्ये सध्या १२ पॉईंट्स आहेत. आणखी एक विजय मुंबईला प्ले ऑफमधल्या प्रवेशाच्या आणखी जवळ नेईल.