IPL 2019: मुंबईच्या चाहत्यांची निराशा, २ मिनिटांमध्ये संपली फायनलची तिकीटं

आयपीएल २०१९ ची फायनल रविवार १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

Updated: May 9, 2019, 08:25 PM IST
IPL 2019: मुंबईच्या चाहत्यांची निराशा, २ मिनिटांमध्ये संपली फायनलची तिकीटं title=

हैदराबाद : आयपीएल २०१९ ची फायनल रविवार १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे. फायनलमध्ये मुंबईची टीम आधीच पोहोचली आहे. तर दिल्ली आणि चेन्नई यांच्यामधली विजयी टीम मुंबईसोबत फायनल मॅच खेळेल. फायनलची दुसरी टीम ठरण्याच्या आधीच मुंबईच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. आयपीएल फायनलची तिकीटं दोन मिनिटांमध्येच विकली गेली आहेत.

बीसीसीआयनं क्रिकेटप्रेमींना कोणतीही पूर्वकल्पना न देता तिकीटांची विक्री केल्यानं बीसीसीआयच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. हैदराबादच्या स्टेडियमची आसन क्षमता ही ३९ हजार आहे. मात्र यातील किती तिकटं विक्रीसाठी उपलब्ध असतील याबाबत कोणालाही माहिती नव्हती. यातील २५ हजार ते ३० हजार तिकीटं विकली गेली असल्याचा अंदाज आहे.

तिकीटांची किंमत १ हजारांपासून २२ हजार ५०० पर्यंत होती. मात्र केवळ १५००, २०००, २५०० आणि ५ हजारांच्या तिकिटांचीच विक्री झाली आहे. यामुळे इतर तिकिटांचं काय झालं हा मोठा प्रश्न असून यामुळे बीसीसीआयच्या विश्वासहर्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे.