India Sports In 2021 : क्रिकेट ते हॉकीपर्यंत, टीम इंडियाची 2021 मध्ये अशी राहिली कामगिरी, पाहा

क्रीडाक्षेत्रात 2021 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर आणि सांघिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियासाठी 2021 वर्ष हे क्रीडा क्षेत्र कसं राहिलं, हे आपण जाणून घेऊयात.

Updated: Dec 30, 2021, 10:29 PM IST
India Sports In 2021 : क्रिकेट ते हॉकीपर्यंत, टीम इंडियाची 2021 मध्ये अशी राहिली कामगिरी, पाहा  title=

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच उत्सूक आहेत. क्रीडाक्षेत्रात 2021 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर आणि सांघिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियासाठी 2021 वर्ष हे क्रीडा क्षेत्र कसं राहिलं, हे आपण जाणून घेऊयात. (team india sports performence 2021 in various game cricket hockey football olympics badminton)  

ऑल्मिपिकमध्ये 13 वर्षानंतर वैयक्तिक पदक

भारताला 2021 हे वर्ष कोरोनासाठी नाहीच तर आणखी एका कारणासाठी आजन्म लक्षात राहिल, तो मुद्दा म्हणजे ऑल्मिपकमध्ये मिळालेलं दुसरं वैयक्तिक पदक. नीरज चोप्राने भारताला वैयक्तिक पातळीवर भाळाफेकीत 18 वर्षांनंतर दुसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं.

तसेच आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या हॉकी टीम इंडियाचं 40 वर्षांनंतर पदक मिळवण्याची प्रतिक्षा संपली. हॉकी टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. तर क्रिकेटमध्ये टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजे टेस्ट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. 

मात्र अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तसेच विराट कोहलीला टी 20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार व्हावं लागलं. तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. 

सुशील कुमारच्या कारकिर्दीला उतरती कळा 

पैलवान सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक मिळवून दिलं. मात्र याच सुशील कुमारच्या कारकिर्दीला कशी उतरती कळा लागली, हे सर्व क्रीडाप्रेमींनी पाहिली.

ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत पहिल्यांदाच राष्ट्रगीत ऐकायला मिळालं. यामुळे भारतीय क्रीडा चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या.  

स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताला पहिलावहिला चॅम्पियन मिळाला. देशवासियांनी नीरज चोप्राला डोक्यावर घेतलं. नीरजला डोक्यावर घेणं हे स्वाभाविक होतं, कारण याआधी भारताचं अ‍ॅथलेटिक्समधील ऑलिम्पिक पदक हे अवघ्या काही सेकंदांनी हुकलं होतं.  

दुसरं वैयक्तिक पदक 

अभिनव बिंद्राने 2008 मध्ये बिजींग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर नीरज चोप्राने जिंकलेलं हे दुसरं सुवर्ण वैयक्तिक पदक होतं. भारताने 2021 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 6 पदकांची कमाई केली. पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात पदक मिळवून दिलं.    

हॉकी

हॉकी टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचा ऑलिम्पिकमधील सुवर्ण इतिहास ऐकून मोठ्या झालेल्या युवा खेळाडूंनी 41 वर्षांनी कारनामा केला. कर्णधार मनप्रीत सिंह आणि गोलकीपर पी आर श्रीजेश यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हॉकी टीम इंडियाने प्लेऑफमध्ये जर्मनीवर 5-4 ने विजय मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. 

कुस्ती

कुस्तीत विनेश फोगाट आणि बजरंग या दोघांवर लक्ष होतं. मात्र रवी दहियाने शांतीत क्रांती आणि मस्तीत कुस्ती करत 57 किलो वजनी गटात  रौप्य पदकाची कमाई केली. बंजरंग पुनिया ही भारतीयांच्या अपेक्षांवर खरा उतरला. बजरंगने कांस्य पदकाची कमाई केली.   

तर दुसऱ्या बाजूला दोनदा ऑल्मिपिकमध्ये पदक जिंकणारा सुशील कुमार पैलवान सागर धनकडच्या हत्याच्या आरोपात तिहार जेलमध्ये आहे. 

बॅडमिंटन

बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू ऑल्मिपिकमध्ये दुसऱ्यांदा वैयक्तिक पदक जिंकणारी दुसरीच भारतीय ठरली. सिंधूने कांस्य पदकाची कमाई केली.     

जागतिक बॅडमिंटन अंजिक्यपद स्पर्धेत किदम्बी श्रीकांतने रौप्य आणि लक्ष्य सेनने कांस्य पदक जिंकून वर्षांचा शेवट गोड केला. लवलीन बोरगोहेनने बॉक्सिंगमध्ये ऑल्मिपिक कांस्य पदकाची कमाई केली. मात्र मेरी कॉम, पूजा राणी आणि 4 बॉक्सर अपयशी ठरले.   

क्रिकेट 

क्रिकेट टीम इंडियाला या वर्षात नव्या दमाचे अनेक दमदार आणि तगडे खेळाडू मिळाले. मात्र दुसऱ्या बाजूला कर्णधार विराट कोहलीला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. 

विराटने टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडलं. त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरुन पायउतार व्हाव लागलं. विराटच्या जागी रोहितला वनडे कॅप्टन करण्यात आलं. 

यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट यांच्यात असलेला वाद जगजाहीर झाला. दोघांनी एकमेकांच्या विधानांचं खंडण केलं.  टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. यासह विराट आणि रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाचा काळही संपला. विराट आणि रवी शास्त्री यांची जागा आता रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या दोघांनी घेतली आहे. 

टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न हे थोडक्यासाठी हुकलं. टीम इंडियाचा न्यूझीलंकडून वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

मात्र टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात लोळवलं. टीम इंडियाने कांगारुंचा कसोटी मालिकेत पराभव केला. 

दरम्यान टीम इंडियाने आता आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने पहिल्यांदाच सेंचुरियनमध्ये सामना जिंकला.     

फुटबॉल

फुटबॉल टीम इंडियाने आठ वेळा सेफ चॅम्पियनशीप जिंकत विक्रम प्रस्थापित केला. सुनील छेत्रीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत  लियोनेल मेस्सीच्या विक्रमाची बरोबरी केली.