आता नुकसान भरपाई द्या! कंगनाची महापालिकेकडे मागणी

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Updated: Sep 16, 2020, 09:14 AM IST
आता नुकसान भरपाई द्या! कंगनाची महापालिकेकडे मागणी title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. त्यानंतर आता पालिकेच्या या कारवाईवर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात नुकसान भरपाईची याचिका दाखल केली आहे. कंगनाने सुधारित याचिका दाखल करत महापालिकेकडे दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. 

अल्पावधीची नोटीस देत कारवाई करणं पक्षपाती आणि चुकीचं असल्याचा आरोप कंगनानं केला होता. त्यानंतर आता राज्यसरकारवर केलेल्या टीकेमुळे कार्यालयावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप तिने सुधारित याचिकेत केला आहे. कंगनाच्या ज्या ऑफिसवर महापालिकेने कारवाई केली, ते तब्बल 48 कोटींचं असल्याची माहिती आहे.  

कंगना रानौतच्या ऑफिसचे Inside photo
 
कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकिस्तान-पीओकेशी केल्यानंतर विविध माध्यमातून तिच्यावर टीका होत आहे. कंगना राणौतच्या मुंबईमध्ये येण्याला शिवसैनिकांनी विरोध केला. तर दुसरीकडे आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र कंगनाला पाठिंबा दिला आहे. तसंच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कंगनाच्या कार्यालयावर ज्याप्रकारे कारवाई करण्यात आली होती, त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. 

कंगनाने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा झाली. बीएमसीने कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने राज्यपालांशी चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती. मला न्याय मिळायला हवा. राज्यपालांनी माझं म्हणणं मुलीप्रमाणे ऐकून घेतलं. मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे. आता न्यायही द्यावा, अशी मागणीही तिने केली आहे.