काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

याठिकाणी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 7, 2019, 08:58 AM IST
काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरातील लासीपोरा येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अजूनही याठिकाणी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भारतीय लष्कराकडून या परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. 

दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून एके सिरीज रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. सुरक्षा दलातर्फे पुलवामा येथील लस्सीपोरा भागात गुरुवारी संध्याकाळपासून दहशतवाद्यांचा शोध सुरु होता. काही वेळानंतर दहशतवादी आणि जवान आमनेसामने आल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. अखेर भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले. हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहे, याची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. ही मोहीम अजूनही सुरु असून यामध्ये अद्याप कोणताही भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त नाही. काही दिवसांपूर्वी पुलवामातून एक पोलीस अधिकारी गायब झाला होता. त्याचा तपास सध्या सुरु आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.

यापूर्वी शोपियन जिल्ह्यातील मोलू-चित्रगाम भागात ३ जून रोजी चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. तर शोपियन जिल्ह्यातच ३१ मे रोजी झालेल्या चकमकी दोन दहशतवादी ठार झाले होते तर एक जवान जखमी झाला होता.