सावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे

Updated: Mar 27, 2023, 03:53 PM IST
सावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार title=

Mahavikas Aghadi : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी झालीय. काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावलीय. मात्र या बैठकीला ठाकरे गट (Thackeray Group) जाणार नाही. सावरकरांवरुन राहुल गांधींनी जी टीका केली. त्यामुळे या बैठकीला न जाण्याचा निर्णय ठाकरे गटानं घेतलाय. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही माहिती दिलीय. 

संजय राऊत यांनी ठणकावलं
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा लढा गुलामगिरीविरोधात होता हे विसरू नका असं संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना ठणकावलंय. आम्ही सोबत आहोत पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही हे राहुल यांची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्याचं राऊत म्हणाले. तर समान किमान कार्यक्रमात सावरकर हा मुद्दा नव्हता असं सांगत नाना पटोलेंनी (Nana Patole) सावरकर या विषयावर बोलणं टाळलं. 

उद्धव ठाकरेंनी टोचले कान
त्याआधी काल मालेगावत झालेल्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सावरकारांच्या वाड्यात मी लहानपणी गेलो होतो. सावरकरांचं काम येड्या गबाळ्याचं काम नाही. सावकरांनी देशासाठी बलिदान दिलंय. त्यांनी 14 वर्ष यातना सोसल्या. आपण एकत्र आलोय ते संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सावकरांनी छळ सोसला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. सावरकर आमचे दैवत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी (Uddhav Thackeray On Rahul Gandhi) यांना ठणकावलं आहे. 

दरम्यान, भाजपची 52 काय 152 कुळं आली तरी ठाकरेंपासून शिवसेना तोडणं शक्य नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. हिंमत असेल तर तातडीने निवडणुका घ्या असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. त्याला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. 

बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान
दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरेंमध्ये धमक असेल तर सावरकर मुद्द्यावर त्यांनी मविआतून बाहेर पडावं, काँग्रेसची (Congress) साथ सोडावी असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 50 वेळेला काँग्रेस पक्षांने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडलं नाही, काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भोगलं अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरेंमध्ये जर धमक असेल, तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे, धमक असेल तर काँग्रेसची साथ सोडण्याचे जाहीर करा, उद्या 11 वाजेपर्यंत जाहीर करा, नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका असं थेट आव्हान बावनकुळेंनी दिलंय. उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे, तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे.. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचे ज्या कुळाला उंची दिली होती, तो तुम्ही बुडविला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचा नाव बुडवत आहात असा आरोपच बावनकुळे यांनी केला.