Crime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय 'सैराट', प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव

MP Crime: मध्यप्रदेश येथे प्रेमप्रकरणाच्या रागातून कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 19, 2023, 01:37 PM IST
Crime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय 'सैराट', प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव title=

MP Crime: तरुण मुला-मुलींचे प्रेम सर्वच कुटुंबियांच्या पचनी पडते असे नाही. पण बऱ्याच ठिकाणी यावर सामंजस्याने मार्ग न काढता धमकी, खूनापर्यंत हे प्रकरण पोहोचते. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातून समोर आला आहे. या घटनेत कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे.

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात तोमर परिवार राहत होता. त्यांना १८ वर्षाची शिवानी नावाची मुलगी होती. वयात आलेल्या मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे तोमर परिवार संतापला होता. यावरुन योग्य मार्ग न काढता परिवाराने गुन्हेगारीकडे जाणारा रस्ता निवडला. 

हा राग इतका हिंसक झाला की कुटुंबीयांनी स्वत:च्या मुलीला संपविले. यासोबतच तिच्या 21 वर्षीय प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली. हे कुटुंबीय एवढ्यावरच थांबले नाही. तर त्यांनी दोघांचे 
मृतदेह मगरींनी भरलेल्या चंबळ नदीत फेकून दिले. शिवानी तोमर आणि राधेश्याम तोमर अशी मृतांची नावे आहेत. मुरैना जिल्ह्यातील रतनबसई गावात ही घटना घडली.

शिवानीचे शेजारील बालुपुरा गावातील राधेश्यामसोबत प्रेमसंबंध सुरू होते. हा प्रकार घरच्यांना कळताच ते चांगलेच संतापले. या संतापाने शिवानी आणि राधेश्यामचा जीव घेतला. त्यानंतर राधेश्यामच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हा या प्रकरणाचे वास्तव समोर आले.

मुलाच्या वडिलांकडून हत्येची भीती व्यक्त 

मुलगा राधेश्यामच्या हत्येमुळे वडिलांना दु:ख अनावर झाले. धक्कादायक घटनेनंतर राधेश्याम तोमरच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. राधेश्याम आणि त्याची मैत्रीण अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्याची हत्या झाल्याचा संशय त्यांनी फिर्याद देताना व्यक्त केला.

सुरुवातीला दोघे पळून गेल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, या दोघांना पळून जाताना गावातील कोणीही पाहिले नव्हते. यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांकडे त्यांच्या मुलीबाबत विचारपूस केली. 

शिवानी आणि राधेश्याम बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने सुत्रे हलविली. दोन्ही परिवाराकडून कसून चौकशी सुरु केली. अनेक तासांच्या चौकशीनंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या तोंडून संपूर्ण घटना समोर आली. 

'३ जून रोजी आम्ही शिवानी आणि राधेश्याम या दोघांचीही गोळ्या झाडून हत्या केली हे मुलीच्या कुटुंबियांनी मान्य केले. दोघांच्या अंगावर मोठी पाने बांधून त्यांना चंबळ नदीत फेकून देण्यात आले होते. चंबळ नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मगरी आहेत.