केवळ स्वत:चा बचाव करण्यासाठी मोदींनी जेटलींना मंत्रिमंडळात ठेवलंय- काँग्रेस

तुमच्या बड्या बाता आणि पोकळ दाव्यांनी सामान्य माणसाचे पोट भरणार नाही.

Updated: Sep 23, 2018, 03:38 PM IST
केवळ स्वत:चा बचाव करण्यासाठी मोदींनी जेटलींना मंत्रिमंडळात ठेवलंय- काँग्रेस title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ स्वत:चा बचाव करण्यासाठी अरूण जेटली यांना मंत्रिमंडळात ठेवले आहे, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केली. ते रविवारी दिल्लीत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारवरील आरोपांना उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांवर हल्ला करण्यासाठी मोदींनी अरूण जेटली यांना मंत्रिमंडळात ठेवले आहे. मी जेटलींना केवळ एवढेच सांगू इच्छितो की, तुमच्या बड्या बाता आणि पोकळ दाव्यांनी सामान्य माणसाचे पोट भरणार नाही. 

तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शनिवारी राफेल विमान खरेदी व्यवहारावरून नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले होते. नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी भारतीय लष्करावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केला, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले होते. या सगळ्या व्यवहाराची संयुक्त संसदीय समिती किंवा महालेखापालांकडून (कॅग) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधींनी केली होती.