फॉर्मात आहेत असं वाटत असतानाही राहुल गांधींचा पराभव का? परखड विश्लेषण...

२०१९ च्या निवडणुकीला दोन वर्षं असताना राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली

Updated: May 24, 2019, 09:58 AM IST
फॉर्मात आहेत असं वाटत असतानाही राहुल गांधींचा पराभव का? परखड विश्लेषण... title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अपयशी ठरलं. देशातील जनतेनं काँग्रेसला हात का दिला नाही? याचं विश्लेषण करणारा हा खास रिपोर्ट... एकेकाळी काँग्रेसच्या राज्यातला सूर्य मावळत नव्हता... तर आता जंग जंग पछाडून देखील काँग्रेसचा सूर्य उगवत नाहीय... फिर एक बार... काँग्रेसची दणदणीत हार, हेच चित्रं काल देशानं पाहीलं... २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं पुन्हा एकदा आपटी खाल्ली... आणि अर्थाच या अपयशाचे धनी ठरलेत ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी... 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'चौकीदार चोर है' अशी शेलकी शेरेबाजी त्यांनी केली. पण मोदींवरील हीच बोचरी टीका राहुल गांधींसाठी बुमरँग ठरली... याप्रकरणी आधीच त्यांना सुप्रीम कोर्टाची माफी मागावी लागली होती. आता देशातील जनतेनं मोदींच्या पारड्यात भरभरून मतं टाकून राहुल गांधींचा पुन्हा एकदा मुखभंग केला. भाजपानंही 'मैं भी चौकीदार' अशी जोरदार मोहीम राबवून काँग्रेसच्या आरोपातील हवा आधीच काढून टाकली होती.

२०१९ च्या निवडणुकीला दोन वर्षं असताना राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र त्यांचं नेतृत्व अपयशी ठरल्यानंच काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. मोदी सरकारच्या विरोधात ते जनमत तयार करू शकले नाहीत. मोदी विरोधकांची एकत्र मोट बांधण्यात राहुल गांधी अपयशी ठरले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड यासारख्या काँग्रेसशासित राज्यातही काँग्रेसची धूळधाण झाली. संघटनात्मक पक्षबांधणी करण्यात राहुल गांधी कमी पडले. पंजाबचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही राज्यात काँग्रेसचा एकही नेता प्रभावी ठरला नाही. ज्या राज्यांमधून दिल्लीचा सत्तेचा राजमार्ग जातो, त्या उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यासारख्या बड्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष संघटना खिळखिळी झाली असून, त्याचाच फटका काँग्रेसला बसला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं प्रियंका गांधी वाड्रांच्या रुपानं 'हुकमाची राणी' मैदानात उतरवली. सरचिटणीसपद देऊन प्रियंकांवर उत्तर प्रदेशातील पूर्वांचलची जबाबदारी सोपवण्यात आली. पण अमेठी आणि रायबरेलीत अनुक्रमे राहुल आणि सोनिया गांधींचा प्रचार करण्यातच त्यांचा वेळ खर्ची पडला. परिणामी प्रियंकास्त्र देखील बेकार ठरलं.

लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळं काँग्रेसचं पेकाट मोडलंय... या पराभवातून काँग्रेस नेमका काय धडा घेणार? घराणेशाहीच्या चौकटीतून आता तरी काँग्रेस बाहेर पडणार का? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.