महाराष्ट्र विकासआघाडीच्या सत्ता स्थापनेविरोधातील याचिका SC ने फेटाळली

महाराष्ट्र विकासआघाडीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Updated: Nov 29, 2019, 03:53 PM IST
महाराष्ट्र विकासआघाडीच्या सत्ता स्थापनेविरोधातील याचिका SC ने फेटाळली title=

नवी दिल्‍ली : महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra) निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची यांच्यासोबत शिवसेनेने आघाडी केली. या आघाडीमुळे जनतेचा विश्वासघात झाला आहे. हा लोकशाहीसाठी चांगले नाही, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. लोकशाहीमध्ये आम्ही कुठल्याही पक्षाला अशी आघाडी करण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. सर्वप्रथम न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी वकीलांना विचारले, निवडणुकीच्याआधी आणि निवडणुकीच्यानंतर होण्याऱ्या आघाडी आणि युतीमध्ये न्यायालयाने दखल घेण्याची गरज आहे का? 

दुसरीकडे महाराष्ट्र विकासआघाडीच्या सत्तास्थापनेविरोधात हिंदू महासभेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेली आघाडी असंविधानिक आहे. निवडणूक प्रक्रीया आणि भारतीय संविधानासोबत ही गद्दारी आहे.  सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालावे, असे या याचिकेत म्हटले होते.

दरम्यान, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज  मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्विकारण्याआधी उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.  पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयाबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.