'...तर पुढच्या चौकात यमराज तुमची वाट पाहत असेल'; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा

UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशमधील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भूमीपूजन आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सूचक विधान करताना हा इशारा दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 19, 2023, 12:31 PM IST
'...तर पुढच्या चौकात यमराज तुमची वाट पाहत असेल'; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा title=
जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना योगी आदित्यनाथ यांनी केलं हे विधान

UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानसरोवर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये 343 कोटी रुपयांच्या विकास योजनांचं लोकार्पण आणि भूमीपूजन केलं. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदित्यनाथ यांनी, 'कायदा हा संरक्षणासाठी असतो. मात्र कायद्याला वेठीस धरुन व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी कोणालाच नाही. कायदा सुरक्षेसाठी आहे. मात्र कोणी आयाबहिणींची छेड काढली तर पुढच्या चौकात यमराज त्या आरोपींची वाट पाहत असतील,' असं सूचक विधान केलं.

विकासकामांच्या आड येणारे अडथळे

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकार विकास, लोक कल्याण आणि भेदभाव न करता सर्व लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. याबद्दलचा संकल्प सरकारने केला असून त्यासाठी सर्व त्या आवश्यक समर्पित उपाययोजना केल्या जात आहे. सरकारबरोबरच नागरिकांनीही आपली कर्तव्यं पार पाडली तर विकासकामांच्या आड येणारे अडथळे आपोआप उघड होतील. विकासाच्या आड येणाऱ्यांचे चेहरे समोर आणण्याचं काम सरकारही करत असल्याचं मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.

विकासकामांना प्रथम प्राधान्य

विकासकामांना सरकारचे प्रथम प्राधान्य आहे. विकासकामासंदर्भात कोणताही बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही. संस्था कोणतीही असली तरी त्यांनी मानक आणि गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड न करता विकासकामं केली पाहिजेत, असं मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले. आज गोरखपूर आणि उत्तर प्रदेशची ओळख ही विकासकामांमुळेच निर्माण झाली आहे, असंही आदित्यनाथ म्हणाले. यावेळेस बोलताना 6 वर्षांपूर्वी गोरखपूरची देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये नेमकी काय स्थिती आहे? या प्रदेशाबद्दल लोक काय विचार करायचे, विकासाची परिस्थिती काय होती याबद्दलही भाष्य केलं.

आरोपींना इशारा

"इथली परिस्थिती काय होती सर्वांना ठाऊक आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मागील 6 वर्षांमध्ये उत्तर प्रदेश आणि गोरखपूरने आपली ओळख निर्माण केली आहे. आज उत्तर प्रदेशची आणि गोरखपूरची ओळख देशामध्ये विकास, सुशासन आणि उत्तम कायदा व्यवस्थेसाठी निर्माण झाली आहे. येथे मागील अनेक दशकांपासून अडकून पडलेल्या विकास योजना सुरु झाल्या आहेत," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. याचवेळी त्यांनी महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांना सोडणार नाही असा सूचक इशारा दिला. 

अनेकदा घडलेत असे प्रकार

मागील काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एनकाऊंटरच्या माध्यमातून अनेक आरोपींचा खात्मा करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी मोठा गोंधळ घातल्याचंही पहायला मिळालं. कधी थेट एनकाऊंटर तर कधी अपघाताच्या माध्यमातून अनेक वादग्रस्त प्रकरणांमधील आरोपींचा कोर्टात खटला सुरु असतानाच आकस्मीक मृत्यू झाला आहे.