औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच  मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

राजीव कासले | Updated: Sep 16, 2023, 03:33 PM IST
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी title=

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नाव संभाजीनगर(Chatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव (Dharashiv) हा नामांतराचा प्रश्न अखेर सुटलाय. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच औरंगाबाद विभाग आणि जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव जिल्हा असं नामांतर करण्यात आलं आहे. यापूर्वी केवळ शहराचं नामांतर झालं होतं मात्र महसूल कार्यालयांची नावं जुनीच होती. आता तीही नामांतरित झाली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयांना नामांतराबाबत आक्षेप मागवले होते या आक्षेपांची शहानिशा झाल्यानंतर नामांतराचा प्रश्न मार्गी लागलाय.. 

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अनावरण झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज करण्यात आलं.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज  मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री  शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचं छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. 

संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक पार पडली.. तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह तब्बल 29 मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.. या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.. मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटी घोषित करण्यात आलेत. 35 हजार कोटी सिंचनाच्या प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तर 14 हजार कोटींचा निधी नदी जोड प्रकल्पासाठी देण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाची आज संभाजीनगरात बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय. यावेळी मराठवाडा वॉटरग्रीडचा ठाकरे सरकारनं खून केला, असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला.