शेतकरी संतापला, ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक

 शेतीमालाला हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीबाबत सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संपाचा लढा तिव्र करण्याचा इशारा दिलाय. ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 2, 2017, 06:44 PM IST
शेतकरी संतापला, ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक title=

अहमदनगर :  शेतीमालाला हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी १ जूनपासून बेमुदत संपावर गेलाय. राज्य सरकारबरोबरची बोलणी फिस्कटल्याने संपाचे हत्यार उपसले. आज संपाचा दुसरा दिवस आहे. सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संपाचा लढा तिव्र करण्याचा इशारा दिलाय. ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिलेय.

अहमदनगरच्या पुणतांबा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत किसान क्रांती कोअर कमिटीने ही घोषणा केली आहे.  शेतकरी संपाची ठिणगी पुणतांबा या गावातून उडाली. गावात संपाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय. शेतकऱ्यांनी दूध पुरवठा बंद केल्याने आता पुणतांबाच्या टी स्टॉल आणि हॉटेल्समध्येही चहावर संकट आलेय.  

शेतकरी संपाला दोन दिवस होत असतानाही राज्यसरकारने कर्जमाफी बाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी येत्या ५ जून रोजी मुंबई वगळता महाराष्ट बंदची हाक दिली आहे. तर ६ जून रोजी सर्व सरकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.