मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर वारकऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया

विठ्ठलाची पूजा आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

Updated: Jul 22, 2018, 06:02 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर वारकऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया title=

सोलापूर: मराठा संघटनांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला विठुरायाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वारकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. 
वारीमध्ये राजकारण आणू नये. विठ्ठलाची पूजा आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेला यावे, असे काही वारकऱ्यांनी सांगितले. 

तर दुसरीकडे, वारीचा सोहळा हा वारकऱ्यांचा आहे. त्यामुळे विठुरायाची पूजा ही मुख्यमंत्र्यांनी नव्हे तर संतांनीच केली पाहिजे, असे मतही अनेकजण व्यक्त करत आहेत. 

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीला विठुरायाच्या दर्शनाला न जाण्यामागची भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली. गेल्या तीन वर्षापासून मी आषाढी पूजेला जातो. पण काही संघटनांनी जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मेगा भरती रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. पण १० लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने मी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.