ग्रामपंचायतीसमोरच महिलेचा अंत्यविधी; अखेर गावकऱ्यांना घ्यावा लागला 'तो' कठीण निर्णय

Latur news: महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात आजही नागरिकांना मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होत नसल्याचे वारंवार स्पष्ट होते. लातूर जिल्ह्यातील  हणमंतवाडी(ता. निलंगा) येथील ग्रामस्थांनी एका महिलेचा अंत्यविधी ग्रामपंचायत (Grampanchayat) चौकात केल्याची घटना समोर आली आहे

Updated: Jan 28, 2022, 12:20 PM IST
ग्रामपंचायतीसमोरच महिलेचा अंत्यविधी; अखेर गावकऱ्यांना घ्यावा लागला 'तो' कठीण निर्णय title=

लातूर : महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात आजही नागरिकांना मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होत नसल्याचे वारंवार स्पष्ट होते. लातूर जिल्ह्यातील (Latur news) हणमंतवाडी(ता. निलंगा) येथील ग्रामस्थांनी एका महिलेचा अंत्यविधी ग्रामपंचायत (Grampanchayat) चौकात केल्याची घटना समोर आली आहे. असं नक्की या ग्रामस्थांनी का केलं असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. जाणून घ्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या चौकासमोरच का अंत्यविधी केला ते...

गेल्या 20 वर्षापासून हणमंतवाडीचे ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमीची  मागणी करीत आहेत. परंतू जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने ही जागा गावकऱ्यांच्या अंत्यविधीसाठी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे प्रेताची अवहेलना होत असल्याची खंत गावकरी व्यक्त करतात. स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांनी अंत्यविधी करायचा कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर कायमच उभा असतो,

गावाने घेतला मोठा निर्णय
हणमंतवाडीच्या गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या कारभाराला वैतागून मोठा निर्णय घेतला. गावातील वृद्ध महिला सोजरबाई रामचंद्र निकम (70 वर्षे) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले होते. परंतू गावात स्मशानभूमी उपलब्ध होत नसल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानंतर महिलेचे ग्रामपंचायत समोरील चौकातच अंत्यविधी करण्यात आले. आतातरी स्थानिक प्रशासनाचे डोळे उघडतील आणि स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.