बेस्ट कर्मचाऱ्यांनी जिंकली मनं, नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे रणांगणात

बेस्ट योद्धे आपली कर्तव्य बजावत राहणार

Updated: May 18, 2020, 10:55 AM IST
बेस्ट कर्मचाऱ्यांनी जिंकली मनं, नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे रणांगणात title=

मुंबई : कोरोनाच्या संकटातही अत्यावश्यक सेवेकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेली मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट. या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपण खऱ्या अर्थाने 'बेस्ट' योद्धे असल्याचं दाखवून दिलं. कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आजपासून बेस्ट बंद ठेवण्याचं आवाहन केलं खरं, पण नेत्यांचा आदेश झुगारून बेस्ट कर्मचारी आपल्या कर्तव्याला जागले. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठीच नेत्यांनी पुकारलेले आंदोलन उधळून लावले आणि आपण खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहोत हे दाखवून दिले.

विशेष म्हणजे बेस्ट सेवा नेहमीप्रमाणे सुरु आहे. रोजच्या प्रमाणे आजही बेस्ट रस्त्यावर धावल्या. सकाळी 9 वाजेपर्यंत 1450 बसेस धावल्या आहेत. सुमारे दोन महिने रेल्वे सेवा बंद आहे. या काळात बेस्ट हीच मुंबईची जीवनवाहिनी बनली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेने संकटकाळात आंदोलन पुकारणारे नेते तोंडावर आपटले आहेत.

बेस्ट यूनियनने कोरोनापासून सुरक्षततेसाठी काही मागण्या केल्या होत्या. आतापर्यंत बेस्टच्या 120 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 52 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. 

बेस्ट कामगारांना १०० टक्के लॉकडाऊन पाळून घरीच राहण्याचे आवाहन केलेले असतानाही ते अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना ने-आण करण्यासाठी ते कामावर हजर राहिले याचा अभिमान असल्याचं कृती समितीने म्हटलं आहे.

कामगारांनी स्वत:च्या व कुटुंबियांच्या हितापेक्षा देशहिताला प्राधान्य दिल्याचा अभिमान आहे. आता तरी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांनी बेस्ट कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, असे कृती समितीने आवाहन केलं आहे.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षततेसाठी मुख्यमंत्री, मनपा आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांना पत्र लिहिलं होतं. पण मागण्या मान्य न झाल्याने सोमवारी काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राव यांची मागणी होती की, बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात यावं. बेस्टच्या प्रत्येक डेपोमध्ये मेडिकल अधिकाऱी असावा. कर्मचाऱ्यांना एक कोटीचा विमा देण्यात यावा.

बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी म्हटलं की, 'बेस्ट अत्यावश्यक सेवा आहे. संपूर्ण स्थिती नियंत्रणात आहे. कोरोना दरम्यान आम्ही ज्या सुविधा देत आहोत ते देत राहू. बेस्ट मुंबईला आपली सेवा देत राहिल.'