अंबानी विरुद्ध मनसे: 'मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना..'; थेट इशाराच

Raj Thackeray Party MNS Slams Mukesh Ambani: रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी गांधीनगरमध्ये आयोजित व्हायब्रंट गुजरात परिषदेच्या कार्यक्रमामध्ये बोलताना हे विधान केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 11, 2024, 02:25 PM IST
अंबानी विरुद्ध मनसे: 'मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना..'; थेट इशाराच title=
मनसेचा अंबांनीवर हल्लाबोल

Raj Thackeray Party MNS Slams Mukesh Ambani: बुधवारी गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील असं म्हटलं. आशियामधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच हे विधान केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर आक्षेप घेत थेट अंबानींवर निशाणा साधला आहे. मराठी माणसालाही मनसेनं त्यांच्या स्टाइलमध्ये इशारा दिला आहे.

मोदींमुळे लोक गुजरातकडे वळले

"मी गेट वे ऑफ इंडिया असलेल्या शहरामधून मॉर्डन इंडियाचं गेट वे असलेल्या गुजरातमध्ये आलो आहे. मी स्वाभिमानी गुजराती आहे. परदेशी लोक जेव्हा नव्या भारताचा विचार करतात तेव्हा ते नव्या गुजरातचा विचार करतात. हा बदल कसा घडला? हा एका नेत्यामुळे घेडलेला आहे. ते आज आपल्या काळातील जगातील आघाडीचे नेते आहेत. ते नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारताच्या इतिसाहातील ते सर्वात यशस्वी नेते आहेत," असं मुकेश अंबानींनी व्हायब्रंट गुजरातच्या मंचावरुन भाषणादरम्यान म्हटलं.

रिलायन्स गुजराती कंपनी

पुढे बोलताना मुकेश अंबानींनी, "रिलायन्स ही सुरुवातीपासूनच गुजराती कंपनी होती, आहे आणि पुढेही राहील. रिलायन्सने 150 बिलियन डॉलर्स म्हणजेच 12 लाख कोटी रुपये मागील 10 वर्षांमध्ये जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा आणि सेवा उभारण्यासाठी गुंतवले आहेत. यापैकी एक तृतियांशहून अधिक पैसा हा एकट्या गुजरातमध्ये गुंतवला आहे," असंही मुकेश अंबानी म्हणाले. 

मनसेचा हल्लाबोल

रिलायन्स ही गुजरातील कंपनी होती, आहे आणि राहील असं विधान मुकेश अंबानी यांनी केलं आहे, असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडेंनी मुकेश अंबानींवर निशाणा साधताना गुजरातला परत जाण्याचा सल्ला दिला. "आम्हाला आतापर्यंत वाटत होतं की रिलायन्स भारतीय कंपनी आहे. मात्र काल त्यांनी स्पष्ट केलं की ही गुजराती कंपनी आहे. त्यांनी असंही स्पष्ट केलं की माझी कर्मभूमी गुजरात आहे. मग तुम्ही महाराष्ट्रात आलात कशाला? आमच्या मराठी माणासाने इथं तुमची कंपनी उभारण्यासाठी जमीनी दिल्या. तुम्हाला वाटत असेल ही गुजरातची कंपनी आहे तर सगळा बाऱ्याबिस्तारा गुंडाळा, तुमचा अँटेलिया गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा. तुमचं महाराष्ट्रात काम काय आहे?" असा सवाल देशपांडे यांनी विचारला.

नक्की वाचा >> 'मोदींनी तरी अंबानींना सांगायला हवं होतं की बाबा, तुझी कंपनी...'; मनसेचा टोला

महाराष्ट्रात काय करताय?

"मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं कुठलंही प्रोडक्ट घेताना विचार केला पाहिजे की आपण भारतीय कंपनीकडून प्रोडक्ट विकत घेत नसून गुजराती कंपनीकडून प्रोडक्ट विकत घेत आहोत. यांचा उद्देश जर फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल तर तुम्ही महाराष्ट्रात काय करताय? हा आमचा प्रश्न आहे," असंही देशपांडे म्हणाले.