हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही, भाजपला नुकसान नाही - चंद्रकांत पाटील

 भाजपला याचे काही नुकसान होणार नाही असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. 

Updated: Dec 8, 2020, 03:38 PM IST
हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही, भाजपला नुकसान नाही - चंद्रकांत पाटील title=

मुंबई : हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही. त्यामुळे भाजपला याचे काही नुकसान होणार नाही असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. आज शेतकऱ्यांनी देशभरात पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभुमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रामध्ये केलेले कायदे शेतकरी हिताचे आहेत की नाही यावर काही महिने चर्चा सुरू आहे. बाहेर देखील माल विकता यावेत अशी मागणी शेतकऱ्यांची असल्याचे पाटील म्हणाले.

ऊसासाठी आधी झोन होता. त्यामुळे शेतकरी गुलाम होता पण गोपीनाथ  मुंडे यांनी झोन बंदी उठवली. भाजीपाला बाहेर विकण्याला परवानगीचा कायदा  महाराष्ट्रात आधीच झाला आहे. त्यामुळे ज्यांना जिथं हवं तिथे आपला माल शेतकरी विकू शकतो असे पाटील म्हणाले.

अनेक राज्यात आंदोलन झालेलं नाही. सगळं काही सेझ साठी सुरू आहे. मूळ कायद्यात जे जे बदल कारायचे आहे, त्यात बदल करायला ते तयार आहेत. पण काही लोकांना कायदाच नको असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय.

मी पंतप्रधान आहे की कोण आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत, आम्हाला शिकवू नये. हे आंदोलन देशभर चालणार नाही असं विधान मी केले होते. बंद यशस्वी झाला आहे का ? हे विचार करण्यापेक्षा शेतकरी किती रस्त्यावर उतरले आहे हे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. 

हे आंदोलन शेतकऱ्यांचे आंदोलन नसल्याने या आंदोलनाचा कोणताच फटका भाजला बसणार नाही. तर मराठा आरक्षण संदर्भात सरकारने ताकदीने बाजू मांडायला हवी असे ते म्हणाले. महादेव जानकर शरद पवार यांना भेटले.. ते काही कामानिमित्त भेटले असतील.. त्यात गैर काय ? असा प्रश्न उपस्थित करत मी देखील त्यांना भेटेन असेही चंद्रकांच पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये जालन्यात काँग्रेसने पाठिंबा देत सहभाग नोंदवला.भारत बंद निमित्त जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील मामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.

आता भाजपची जनजागृती मोहीम 

मुंबई । शेतकरी कायद्याला होणार विरोध आणि भारत बंद आंदोलन या मुद्द्यावर प्रतिहल्ला चढवण्याची भाजपने रणनीती आखली आहे. शेतकरी कायद्याबद्दल व्यापक जनजागृती करण्याची रणनीती भाजप आखत आहे. आमदार - खासदार - पदाधिकारी  - कार्यकर्ते यांच्यामार्फत लोकांमध्ये जात शेतकरी कायदा कसा उपयुक्त आहे, योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न यापुढच्या काळात केला जाणार आहे. या प्रचारासाठी कुठलाही मुहूर्त न निवडता स्थानिक पातळीवर खास करून ग्रामीण भागात जनजागृती मोहीम अंमलात आणण्याची रणनीती भाजप तयार करत आहे.

शिवसेनेच्या बाईक रॅलीला मज्जाव

लातूर । केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या लातूर बंद मध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाचीचेही प्रसंग घडले. लातूर बंदचे आवाहन करण्यासाठी शिवसेनेने मोटारसायकल रॅली काढली. ही रॅली गंजगोलाईकडे जात असताना पोलिसांनी हनुमान चौकात अडवली. यावेळी पोलिसांनी गंजगोलाईत रॅली घेऊन जाण्यास मज्जाव केला.